बॉलिवूडमधील एव्हरग्रीन अभिनेते ऋषी कपूर यांनी वयाच्या ६७ वर्ष जगाचा निरोप घेतला. ३० एप्रिल रोजी सकाळी ८.४५ वाजता उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाची माहिती समजताच संपूर्ण कलाविश्वावर एकच शोककळा पसरली. यामध्येच नीतू कपूर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या भावना व्यक्त केला होत्या. त्यानंतर त्यांनी आणखी एक पोस्ट शेअर करत ‘आमच्या कथेचा अंत झाला’, असं म्हटलं आहे. त्यांची ही पोस्ट वाचल्यानंतर अनेकांनी हळहळ व्यक्क केली आहे.

ऋषी कपूर यांनी अचानकपणे घेतलेल्या एक्झिटमुळे साऱ्यांनाच धक्का बसला आहे. त्यातच कपूर कुटुंबाने त्यांच्या घरातील एक हरहुन्नरी व्यक्ती गमावलं आहे. त्यामुळे त्यांची उणीव घरातील प्रत्येक सदस्याला कायम जाणवेल. यामध्येच नीतू कपूर सध्या प्रचंड भावनिक झाल्या असून त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत ऋषी यांच्या आठवणी जपण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी इन्स्टाग्रामवर ऋषी यांचा फोटो शेअर करुन ‘आमच्या कथेचा शेवट झाला’, असं म्हटलं आहे.

 

View this post on Instagram

 

End of our story

A post shared by neetu Kapoor. Fightingfyt (@neetu54) on

ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांच्यातलं प्रेम साऱ्यांनाच ठाऊक होतं. एकमेकांच्या प्रेमात पडल्यापासून ते आतापर्यंत या दोघांनी कायम एकमेकांची साथ दिली. त्यामुळेच सध्या नीतू यांनी ऋषी कपूर यांची सल भासत आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवर ऋषी यांचा फोटो शेअर केला असून यात त्यांच्या हातात एक ग्लास आहे. या फोटोमध्ये त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. हा फोटो आणि त्यावर नीतू यांनी दिलेली कॅप्शन पाहून अनेकांना गहिवरुन आलं आहे.

दरम्यान, नीतू कपूर आणि ऋषी कपूर ही कलाविश्वातील बेस्ट जोडी म्हणून ओळखली जायची. नीतू यांनी प्रत्येक पावलावर ऋषी यांची साथ दिली. त्यांच्यावर विदेशात उपचार सुरु असतानादेखील नीतू कायम त्यांच्यासोबत असायच्या. ऋषी कपूर यांची ३० एप्रिल रोजी प्राणज्योत मालवली. मुंबईतील मरीन लाइन्स येथील चंदनवाडी स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोजक्या जणांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात आले.