प्रसिद्ध अभिनेते सौमित्र चटर्जी याचं निधन झालं आहे. ते ८५ वर्षांचे होते. प्रकृती खालावल्यामुळे रुग्णालयात त्यांना लाइफ सपोर्टवर ठेवण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांनी प्राणज्योत मालवली. सौमित्र चटर्जी यांच्या निधनामुळे भारतीय सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी याने ट्विटरच्या माध्यमातून आपलं दु:ख व्यक्त केलं.

“आज सिनेसृष्टीचं खूप मोठं नुकसान झालं आहे. आज आपण एक महान कलाकार गमावला आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, ही प्रार्थना!” अशा आशयाचं ट्विट करुन नवाजने सौमित्र चटर्जी यांना भावपुर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. नवाजसोबतच दिया मिर्झा, अनुपम खेर, रितेश देशमुख, रेणुका शहाणे, नंदिता दास यांसारख्या अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

कोण होते सौमित्र चटर्जी?

सौमित्र चटर्जी हे बंगाली कलाविश्वातील एक नावाजलेलं नाव होतं. त्यांनी १९५९ मध्ये अपुर संसार या चित्रपटाच्या माध्यमातून करिअरची सुरुवात केली. प्रसिद्ध दिग्दर्शक सत्यजीत रे यांच्यासोबत त्यांनी जवळपास १४ चित्रपटांमध्ये काम केलं होतं. विशेष म्हणजे फ्रान्समधील सर्वात मानाचा Ordre des Arts et des Lettres या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. त्याचसोबत त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कारानेदेखील गौरविण्यात आलं होतं. इतकंच नाही तर ३ वेळा त्यांना राष्ट्रीय पुरस्कार, संगीत नाटक अकॅडमी पुरस्कार, ७ फिल्मफेअर व पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.