बॉलिवूड गायक आणि संगीत दिग्दर्शक विशाल दादलानी याने पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधला आहे. भाजपाने शनिवारी महाराष्ट्र सरकारकडे औरंगाबादचं नाव बदलण्याची मागणी केली. भाजपाने औरंगाबादचं नाव बदलून संभाजीनगर करण्याची मागणी केली आहे. याच मागणीवरुन विशाल दादलानीने भाजपावर निशाणा साधत सत्ता जाताच यांची सर्कस सुरु झाल्याचा टोला लगावला आहे.

विशाल दादलानीने ट्विट करत म्हटलं आहे की, “पाच वर्ष सरकारमध्ये होते तेव्हा तर नाव बदललं नाही. सत्तेतून बाहेर येताच सर्कस सुरु झाली आहे. काय साहेब…लोक मूर्ख वाटले का?”.

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचे आम्ही वंशज आहोत, औरंगजेबाचे नाही. त्यामुळे औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर झालंच पाहिजे, अशी आग्रही मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केली आहे. औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ही मागणी केली.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, “औरंगाबादच्या नामांतरासंदर्भात सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल आहे. त्या याचिकेच्या सुनावणीच्या प्रक्रियेला गती देऊन शहराचं नाव बदलले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे आम्ही वंशज आहोत, औरंगजेबाचे नाही. औरंगजेब हा महाराष्ट्राचा शत्रू होता. त्यामुळे या शहराचे नामांतर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावे करावे”.