विश्वचषक स्पर्धेत भारत विरूद्ध पाकिस्तान हा दोन कट्टर प्रतिस्पर्धी संघांचा सामना रविवारी रंगला होता. या सामन्यात भारताने पाकिस्तानवर ८९ धावांनी विजय मिळवला. ज्यानंतर अवघ्या देशभरात दिवाळी साजरी झाली. जल्लोष आणि उत्साह देशभरात भरभरून वाहताना दिसला. अशात बॉलिवूडनेही टीम इंडियाचं अभिनंदन केलं आहे. अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर ट्विट करून टीम इंडियाचं कौतुक केलं आहे.

अभिनंदन टीम भारत! फ्रॉम भारत असं म्हणत अभिनेता सलमान खानने त्याचा इंडियाची जर्सी घातलेला फोटो ट्विट केला आहे. सलमानचा भारत हा सिनेमा काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. या सिनेमाला चांगला प्रतिसादही मिळाला. रविवारी सलमानने ट्विट करत टीम इंडियाचं कौतुक केलं आहे. टीम इंडियाची जर्सी घातलेला त्याचा फोटो पहिल्यांदाच समोर आला आहे. सलमानच्या ट्विटला ३५ हजारांच्या वर लाईक्स मिळाले आहेत.

संपूर्ण रविवार मी टीव्हीकडेच डोळे लावून बसलो होतो. भारत आणि पाकिस्तान यांच्यातला सामना छान झाला. भारताचा विजय मोठा आहे यात माझ्या मनात काहीही शंकाच नाही या आशयाचं ट्विट अनिल कपूरने केलं आहे.

वाह! काय विजय आहे असं म्हणत तमन्ना भाटियानेही ट्विट करत टीम इंडियाचं अभिनंदन केलं आहे.

हे सात जन्माचं नातं आहे, आज सातवा फेराही पूर्ण झाला. पाकिस्तानने असंच हरत रहावं, मेन इन ब्लूचं अभिनंदन या आशयाचं ट्विट विवेक ओबेरॉयने केलं आहे.