छोट्या पडद्यावरील लोकप्रिय ‘द कपिल शर्मा शो’ पुन्हा एकदा सुरू झाला असून सध्या सोशल मीडियावर त्याचीच चर्चा पाहायला मिळतेय. या कॉमेडी शोच्या शूटिंगला सुरुवात झाली असून त्याचे नवीन एपिसोड्स प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. मात्र ‘द कपिल शर्मा शो’चा नुकताच पार पडलेला एक एपिसोड नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला नाही. त्यावर आक्षेप घेत नेटकऱ्यांनी कपिल शर्माच्या शोवर बंदीची मागणी केली आहे.

या शोमध्ये अभिनेता मनोज वाजपेयी आणि दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी नुकतीच हजेरी लावली. याच एपिसोडमध्ये किकू शारदा आणि कृष्णा अभिषेक यांनी केलेली कॉमेडी नेटकऱ्यांना आवडली नाही. किकू आणि कृष्णाने मिळून रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांची नक्कल केली. अर्णब यांनी सलमान खानचं नाव घेत बॉलिवूडमधल्या ड्रग्स प्रकरणावर भाष्य केलं होतं. त्याचा संदर्भ घेत या दोघांनी अर्णबची नक्कल केली.

विशेष म्हणजे ‘द कपिल शर्मा शो’चा निर्माता सलमान खान आहे. त्यामुळे शोमध्ये अर्णबची खिल्ली उडवली असावी असं म्हणत नेटकऱ्यांनी शोवर बंदी मागणी केली.