गुरुग्राममधील ‘रायन इंटरनॅशनल’ शाळेत शिकणाऱ्या सात वर्षीय प्रद्युम्नच्या हत्येमुळे संपूर्ण देश हळहळतोय. प्रद्युम्नच्या हत्येचे पडसाद देशभर उमटत असताना ‘रायन इंटरनॅशल’ शाळेबाहेर निदर्शने आणि जाळपोळदेखील करण्यात आली. शाळेच्या शौचालयात दुसरीच्या वर्गातील प्रद्युम्नचा गळा चिरलेला मृतदेह सापडल्याने खळबळ माजली होती. चौकशी अंती शाळेच्या बस कंडक्टरने त्याची हत्या केल्याचे स्पष्ट झाले. कंडक्टर प्रद्युम्नचे लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न करत होता. पण प्रद्युम्नने त्याला विरोध केल्यामुळे त्या कंडक्टरने त्या इवल्याशा जीवाची निघृण हत्या केली. सर्वसामान्य जनता, राजकारणी ते कलाकार सर्वांकडूनच या घटनेचा तीव्र निषेध करण्यात येत आहे.

‘सेन्सॉर बोर्डा’चे अध्यक्ष आणि गीतकार प्रसून जोशी यांनी या घटनेवर हृदयद्रावक कविता केली आहे. अगदी थोड्याच वेळात ही कविता सोशल मीडियावर व्हायरल झाली. कवितेची प्रत्येक ओळ आपल्याला अंर्तमुख केल्याशिवाय राहत नाही.

कथा पडद्यामागचीः रंगभूमीवर तुम्ही दररोज नव्याने जगत असता: आस्ताद काळे

अभिनेत्री रेणुका शहाणे यांनीही या घटनेचा उल्लेख धक्कादायक, भयानक आणि निराशाजनक अशा शब्दांत केला. फेसबुकवर आपले मत व्यक्त करत त्या म्हणाल्या की, ‘आपण आपल्या मुलांसाठी सर्व गोष्टी सुरक्षित कशा करु शकतो ? आपली मुलं सुरक्षित राहतील या विश्वासाने पालक त्यांच्या मुलांना शाळेत सोडतात. पण, इंटरनॅशनल शाळांमध्ये एकापाठोपाठ एक घडत असलेल्या या घटनांमुळे त्यांना बक्कळ फी देऊनही सुरक्षेमध्ये करण्यात येणारा हलगर्जीपणा दिसून येतो. या घटना पाहता शाळेचे विश्वस्त, व्यवस्थापन आणि शिक्षक यांच्यावर विश्वास तरी कसा ठेवायचा?’

तर अभिनेता संजय दत्त यानेही अशा घटना ऐकल्यावर पिता म्हणून स्वतःला लाचार समजत असून, हा मुलांसाठी तसेच पालकांसाठीही अतिशय वाईट काळ सुरू असल्याचे म्हटले आहे.