बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपुतच्या आत्महत्येला आता दिड महिन्यांपेक्षा अधिक वेळ होऊन गेला आहे. मुंबई व बिहार पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. मात्र सुशांतच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे यासंदर्भात बिहार सरकारनं सीबीआय चौकशीची शिफारस केंद्राकडे केली होती. त्याला अखेर केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाचा तपास करण्यासाठी सीबीआयला केंद्राकडून अधिकृत सूचना मिळाल्या आहेत.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार केंद्र सरकारने बिहार सरकारची मागणी मान्य केली आहे. सुशांत मृत्यू प्रकरणाची CBI चौकशी केली जाईल. यासाठी सीबीआयला केंद्राकडून अधिकृत सूचना मिळाल्या आहेत. केद्रानं घेतलेल्या या निर्णयामुळे सुशांतचे चाहते समाधान व्यक्त करत आहेत.

सुशांत मृत्यू प्रकरण : मुंबई पोलीस आयुक्तांनी सांगितलेले १० महत्त्वाचे मुद्दे

१. सुशांत मृत्यू प्रकरणी आतापर्यंत ५६ लोकांचे जबाब नोंदवले गेले आहेत. व्यावसायिक वैर, आर्थिक व्यवहार किंवा आरोग्य अशा सर्व मुद्द्यांवरून तपास सुरू आहे.
२. सुशांत दुभंगलेलं व्यक्तिमत्त्व (bipolar disorder) या मानसिक आजाराने त्रस्त होता आणि त्यासाठी तो उपचार घेत असल्याचं उघडकीस आलं आहे.
३. कोणत्या कारणामुळे त्याचा मृत्यू झाला हा आमच्या तपासाचा विषय आहे.
४. १६ जून रोजी सुशांतचे वडील, बहीण आणि मेहुण्याचा जबाब नोंदवला गेला.
५. त्यावेळी सुशांतच्या कुटुंबीयांनी आमच्या तपासाबद्दल कोणतीच शंका उपस्थित केली नव्हती. आमच्या तपासात काही त्रुटी असल्याची तक्रारसुद्धा त्यांनी केली नव्हती.
६. सुशांतच्या मृत्यू प्रकरणी मुंबई पोलिसांनी जबाब नोंदवलेल्या ५६ लोकांमध्ये रिया चक्रवर्तीचाही समावेश आहे.
७. रियाचा जबाब दोन वेळा नोंदवला गेला. तिला पोलीस ठाण्यातही अनेकदा बोलावलं गेलं.
८. ती आता कोठे आहे, याबाबत मी वक्तव्य करू शकत नाही.
९. बिहार पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरनुसार सुशांतच्या खात्यातून १५ कोटी रुपये काढून घेण्यात आले.
१०. सुशांतच्या खात्यात १८ कोटी रुपये होते आणि त्यापैकी साडेचार कोटी रुपये अजूनही खात्यात आहेत, असं आमच्या तपासात निदर्शनास आलं. सुशांतच्या अकाऊंटमधून रियाच्या अकाऊंटमध्ये थेट पैसे ट्रान्सफर झाल्याची कोणतीही माहिती समोर आली नाही. याबाबत अजून तपास सुरू आहे.