चार दशकांहून अधिक काळ हिंदी चित्रपटसृष्टीत घालवलेल्या अमिताभ बच्चन यांनी झगमगाटाच्या मागे सेलिब्रिटीचे आयुष्य काय असते, याचे गुपित उलगडले आहे. सेलिब्रिटीचे आयुष्य म्हणजे एकटेपणा आणि असुरक्षितता असल्याचे मत त्यांनी आपल्या ब्लॉगवर मांडले आहे.
सभोवताली घडणाऱया घडामोडींचा होणारा परिणाम आणि दबाव या दोन्हींचा सेलिब्रिटींना कायम सामना करावा लागतो. याचा त्यांच्या करिअरवरही परिणाम होतो, असे अमिताभ बच्चन यांनी म्हटले आहे. सेलिब्रिटींना सगळ्यांमध्ये राहूनही एकटेपणाने जगावे लागते. त्याचवेळी सततच्या असुरक्षिततेचाही त्यांना सामना करावा लागतो. करिअरसाठीच्या वाटचालीमध्ये कोणतीही अडचण येऊ नये, म्हणून काहीवेळा त्यांना झुकावेही लागते, असे त्यांनी ब्लॉगवरील नव्या पोस्टमध्ये लिहिले आहे.
वृत्तमूल्य असल्यामुळे अनेकवेळा सेलिब्रिटींना दबावाचा सामना करावा लागतो. या परिस्थितीचा अत्यंत समंजसपणे सामना करणे हे सुद्धा सेलिब्रिटींसाठी आव्हानच असते. माध्यमांमध्ये चर्चेत राहण्यासाठी त्यांना इतरांची मदतही घ्यावी लागते, असे अमिताभ बच्चन म्हणतात.