करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा लॉकडाउन करण्यात आला. पण प्रेक्षकांच्या मनोरंजनाचा वसा घेतलेल्या झी मराठी वाहिनीवरील लाडक्या मालिकांचं चित्रीकरण मात्र थांबलं नाही. महाराष्ट्राच्या बाहेर या मालिकांचं चित्रीकरण सुरु असून प्रेक्षकांच्या मनोरंजनात मात्र खंड पडला नाही.

या कठीण वेळी सगळ्यांना हसवण्याचा विडा घेतलेले महाराष्ट्राचे लाडके विनोदवीर आणि प्रेक्षकांचा लाडका कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’ जयपूरमध्ये शूटिंगसाठी रवाना झाला होता. पण आता नवीन नियमावलीनुसार मुंबईमध्ये चित्रीकरणाची परवानगी दिली असल्यामुळे हे विनोदवीर मुंबईमध्ये शूटींगसाठी सज्ज झाले आहेत.

आणखी वाचा : शुभ्रा मोडणार सुझॅनची खोड, ‘अग्गबाई सूनबाई’मध्ये नवे वळण

तसेच काही कारणांमुळे जयपूरला चित्रीकरणासाठी न गेलेले डॉक्टर निलेश साबळे, सागर कारंडे आणि भारत गणेशपुरे आता नवीन भागांतून प्रेक्षकांच्या भेटीस येतील. त्यामुळे चला हवा येऊ द्याचे जुने आणि नुकतेच सहभागी झालेले नवीन विनोदवीर प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज झाले आहेत. आगामी भागात भाऊ अतरंगी अवतारात, त्यांच्या भन्नाट कॉमिक टायमिंगने प्रेक्षकांना हसवणार आहे तर सागर कारंडे साकारणारा पोस्टमन काका पुन्हा प्रेक्षकांना पाहायला मिळेल. प्रेक्षक देखील या संपूर्ण टीमला पुन्हा एकदा टीव्हीवर पाहण्यासाठी उत्सुक आहे यात शंकाच नाही.