छोट्या पडद्यावरील ”चला हवा येऊ द्या” ही मालिका लोकप्रिय विनोदी मालिकांपैकी एक आहे. या मालिकेने अवघ्या महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेचे मन जिंकले आहे. त्यांना मनापासून हसायला याच मालिकेने शिकवले आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्या सगळ्या कलाकारांनी त्यांच्या आयुष्यातील काही भन्नाट किस्से सांगितले आहेत.

झी २४ ने दिलेल्या वृत्तानुसार, कुशलने त्याच्या आईच्या वाढदिवसाचा किस्सा सांगितला. त्या आधी कुशलने त्याला आलेला एक सुंदर अनुभव सांगितला आणि म्हणाला की प्रत्येक आई-वडिलांच्या आयुष्यात हा क्षण यावा अशी माझी इच्छा आहे. “मी ठाण्यात शिफ्ट झालो तेव्हा एकदा आईची मैत्रीण तिला भेटायला तिथे आली होती, त्या दोघी जवळपास २५ वर्षांनी एकमेकींना भेटल्या होत्या. मैत्रीणीला भेटल्यावर आईला इतका आनंद झाला होता की मी तिला एवढं आनंदी कधी बघितलच नव्हतं. तेव्हा ते पाहून मला कल्पना आली की आपण आईच्या दुसऱ्या जुन्या मित्र-मैत्रिणींना पण बोलवायचं,” असं कुशल म्हणला.

पुढे तो म्हणाला,”मग प्रत्येकाच्या कॉन्टॅक्ट मधून मी तिचे असे अनेक मित्र-मैत्रिणींना शोधलं. ते सगळे जवळपास  ४५ वर्षांपूर्वी तिच्यासोबत शाळेत होते. मग मी आणि माझ्या भावाने ठरवलं की आमच्या गावातल्या घरी त्यांच एक गेट-टुगेदर ठेवायचं. त्या दिवशी त्या सगळ्यांना एकत्र पाहून आईला आनंद झाला. तो दिवस आमच्या सगळ्यांसाठी खूप सुखद आणि खूप मोठा होता. मला असं वाटतं की असा दिवस प्रत्येक आई-वडिलांच्या आयुष्यात एकदा आलाचं पाहिजे.”