बॉलिवूड विश्व आणि तिथे रंगणाऱ्या चर्चा यांचे एक अनोखे समीकरण आहे. त्यातही या चर्चांमध्ये चित्रपटवर्तुळातील काही मोठी नावे असली की, या चर्चा आणखीनच जास्त रंगतात. सध्या बॉलिवूडमध्ये चर्चा आहे, ती म्हणजे करण जोहर आणि अभिनेता चंद्रचूड सिंगची. जोश’, ‘माचिस’ या चित्रपटांतून झळकलेल्या अभिनेता चंद्रचूड सिंगने विविध चित्रपटांतून भूमिका साकारत त्याची एक वेगळीच ओळख निर्माण केली होती. गेला काही काळ चित्रपटसृष्टीपासून दूर असणाऱ्या चंद्रचूड सिंगने त्याच्या बॉलिवूड कारकीर्दीमधील एका टप्प्याचा खुलासा केल्यामुळे सध्या अनेकांच्याच भुवया उंचावल्या आहेत. बी टाऊनमधल्या प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने एका भूमिकेसाठी चंद्रचूड सिंगला विचारले असता त्याने या भूमिकेसाठी नकार दिला होता.

अभिनेत्री नेहा धुपियाच्या ‘नो फिल्टर नेहा’ या कार्यक्रमामध्ये १९९०- २००० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेता चंद्रचूड सिंग याने काही गोष्टींचा खुलासा केला आहे. चंद्रचूडच्या म्हणण्यानुसार करणने त्याच्या ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटामध्ये ‘अमन’च्या भूमिकेसाठी त्याला विचारले होते. शाहरुख खाननंतर या चित्रपटामध्ये सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकेसाठी करण एका अभिनेत्याच्या शोधात होता.

करणने या भूमिकेसाठी जेव्हा चंद्रचूडला विचारले होते, तेव्हा त्याने याविषयी विचार करण्यासाठी अपेक्षेपेक्षा जास्त वेळ घेतला आणि त्यानंतर त्याने हे पात्र साकारण्यासाठी नकार दिला. चंद्रचूडने नकार दिल्यानंतर ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटामधील ‘अमन’ची भूमिका अभिनेता सलमान खानने साकारली. सलमानने साकारलेल्या या भूमिकेला चाहत्यांची पसंती मिळाली. आजही त्याने साकारलेला ‘अमन’ अनेकांच्या पसंतीस उतरत आहे. पण, करण जोहर सारख्या नामवंत निर्माता-दिग्दर्शकाने आणलेल्या प्रस्तावाला नकार दिल्याचा खुलासा केल्यामुळे सध्या बी टाऊनमध्ये चंद्रचूड सिंगच्याच नावाची चर्चा आहे.