रेश्मा राईकवार छपाक ‘चंद छिटे उडा के जो गया.. छपाक से पहचान ले गया’.. गीतकार गुलजार यांच्या या दोन ओळींत ‘छपाक’ चित्रपटाचे सगळे सार आहे. या दोन ओळीत काही कारण नसताना एका मुलीचे अस्तित्वच नष्ट करणारी ही ‘चंद छिटें’ खूप महत्त्वाची आहेत. ती फक्त अॅसिडची नाहीत, स्त्रीचे सौंदर्य मला उपभोगता आले नाही तर ते इतर कोणालाही उपभोगता येणार नाही या विकृत विचारांचा शिडकावाच कधी बलात्कार तर कधी अॅसिड हल्ल्याच्या स्वरूपात होतो आणि स्त्रीच्या अस्तित्वाचीच चाळणी होते. त्यामुळे स्त्रीवर होणाऱ्या कोणत्याही अपराधासंदर्भात बोलताना या विखारी विचाराची रुजवात मुळापासून उपटून काढायला हवी, हा विचार दिग्दर्शक मेघना गुलजार यांनी ‘छपाक’मधून अधोरेखित केला आहे. ‘छपाक’ ही अॅसिड हल्ला पीडित लक्ष्मी अगरवाल हिच्या आयुष्यावर आधारित खरी कथा आहे. पण केवळ लक्ष्मीवर झालेल्या हल्ल्याची आणि त्यातून ती पुन्हा कशी उभी राहिली हे सांगून चित्रपट थांबत नाही. मुळात, लक्ष्मीची कथा का सांगायची आहे? एका क्षणात तरुण, उत्साहाने सळसळणाऱ्या अशा महत्त्वाकांक्षी मुलीच्या आयुष्याची राखरांगोळी करण्याची क्षमता ज्या अॅसिडमध्ये आहे. ना त्या अॅसिडच्या खुलेआम विक्रीला धरबंद बसला आहे ना त्या अॅसिड फेकणाऱ्या मुजोर मनगटांची मान फासावर लटकली आहे, ही गोष्ट दिग्दर्शक आणि लेखिका द्वयीने खूप थेट आणि सरळपणे मांडली आहे. दिल्लीत २००५ मध्ये अवघ्या १५ वर्षांच्या लक्ष्मीवर अॅसिड हल्ला झाला होता. इथे चित्रपटात मालतीची गोष्ट म्हणून ही वास्तव घटना दिग्दर्शक मेघना गुलजार यांनी रेखाटली आहे. आपल्या प्रेमभावनेला दाद देत नाही म्हणून ३२ वर्षांच्या बशीर खानने मालतीच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकले. आपला संपूर्ण चेहरा गमावलेल्या मालतीचा स्वत:शी सुरू असलेला झगडा, तिच्यावर झालेल्या शस्त्रक्रिया आणि शस्त्रक्रि येनंतरचा बदललेला चेहरा मुळात स्वत: स्वीकारण्यापासून ते समाजाचा आपलेपणा मिळवण्यापर्यंतचा तिचा संघर्ष यात दिसतो. मालतीचा हा संघर्ष कथेचा केंद्रबिंदू आहेच, त्यामुळे तो धागा लेखनातही अतिका चौहान आणि मेघना गुलजार यांनी सोडलेला नाही. मात्र दिग्दर्शनात त्याची मांडणी करताना अॅसिड हल्ले करणाऱ्यांना कायद्याने कठोर शिक्षा होत नाही म्हणून करावा लागलेला संघर्ष आणि मुळात अॅसिडच्या खुलेआम विक्रीवर निर्बंध घालण्याची आवश्यकता या गोष्टींवर मेघना गुलजार यांनी भर दिला आहे. त्यासाठी मालतीच्या वकील अर्चना बजाज यांनी केलेले प्रयत्नही या कथेचा तितकाच महत्त्वाचा भाग आहे. यात कुठलाही मुद्दा बाजूला पडणार नाही याची पुरेपूर काळजी घेत मेघना यांनी पाहणाऱ्या प्रत्येकाला विचार करायला लावेल इतक्या प्रभावी पद्धतीने चित्रपटाची मांडणी केली आहे. वास्तव घटनांची मांडणी करताना अनेकदा तो मेलोड्रॅमॅटिक पद्धतीनेच साकारण्याकडे कल दिसून येतो. इथे मात्र दिग्दर्शकाने ते टाळले आहे. आरशात पहिल्यांदा आपला चेहरा बघितल्यानंतर मालतीची झालेली अवस्था असेल किंवा तिला पाहून घाबरणारा समाज अशा अनेक घटना खूप संयत आणि वास्तव पद्धतीने त्या हाताळल्या आहेत. ही वास्तव मांडणी कलाकारांच्या कमाल अभिनयाने धारदार झाली आहे. दीपिका पदुक ोणला त्या तुलनेत आजवर ग्लॅमरसच भूमिकांमधून प्रेक्षकांनी पाहिलेलं आहे. इथे मात्र ती पूर्णपणे वेगळ्या रूपात आपल्यासमोर येते. मालतीच्या भूमिकेसाठी दीपिकाने काही खास लकबी, देहबोलीचा वापर केला आहे. त्यामुळे मालतीची व्यक्तिरेखा जास्त प्रभावी ठरते. अगदी काही प्रसंगात दीपिकाचे वय आणि मालतीचे घटना घडली त्यादरम्यानचे वय या गोष्टी सहजी जुळत नाहीत. पण त्यामुळे फार फरक पडत नाही, दीपिकाने आपल्या सहज अभिनयाने त्यावर मात केली आहे. विक्रांत मसी हा उत्तम अभिनेता आहे आणि त्याने पुन्हा एकदा अमोलच्या भूमिकेतून हे सिद्ध केले आहे. दीपिकाबरोबर वावरताना कु ठेही त्याच्या अभिनयात दडपण जाणवत नाही, उलट थोडासा अस्ताव्यस्त, कोणालाही उद्धट वाटेल असा अमोल त्याने मस्त रंगवला आहे. या दोघांबरोबरच वकील अर्चना बजाज यांची भूमिका करणारी अभिनेत्री मधुरजीत सरगी आणि मालतीचा सांभाळ करणाऱ्या शिराजची भूमिका साकारणारी पायल नायर या दोन अभिनेत्री ठळकपणे लक्षात राहतात. खूप साधे पण प्रभावी संवाद, अभिनय-दिग्दर्शन या सगळ्याच गोष्टी ‘छपाक’मध्ये उत्तम जमून आल्या आहेत. मेघना गुलजार यांची दिग्दर्शन आणि लेखनावरची पकड, प्रभुत्व पुन्हा एकदा जाणवून देणारा हा चित्रपट आहे. यात नायकाच्या तोंडी एक संवाद आहे, अॅसिडचा विखार हा नंतर चेहऱ्यावर उतरतो पण मुळात तो डोक्यात पहिल्यांदा उतरलेला असतो. प्रत्येक माणसांत बरेवाईट गुण-दोष असतात पण नेमके एखाद्या बाबतीत असे काय होते की हा विखार मनातून अशा पद्धतीने दुसऱ्याच्या आयुष्यावर उतरवला जातो? हा प्रश्न इथे खूप महत्त्वाचा आहे. त्याचे उत्तर मालती न्यायालयात ज्या पद्धतीने देते त्या फ्लॅशबॅक तंत्राच्या वापरालाही तोड नाही. सामाजिक आशय मांडताना त्यातला नेमकेपणा मांडणे ही मेघना गुलजार यांची हातोटी आहे जी ‘छपाक’मध्येही अशा उत्तम जमलेल्या प्रसंगांमधून अनुभवायला मिळते. म्हणूनच मालतीची कथा संपता संपता तिने अॅसिड विक्रीवर रोख लावण्यासाठी केलेली जनहित याचिका, त्यावर अथक संघर्षांनंतर पूर्णपणे नाही पण काही प्रमाणात मिळालेले यश आणि वैयक्तिक आयुष्यातही जोडीदार मिळेपर्यंतचा तिचा प्रवास हा कुठेतरी आपल्याला आतून शांत करत नाही तोवर दिग्दर्शक आपल्या चेहऱ्यावर आजच्या वास्तवाचे जळजळीत अॅसिड फेकतो. त्या छपाक क्षणातला थरार हा अजूनही अंगावर काटा आणतो.