'तान्हाजी : द अनसंग वॉरिअर' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर तुफान गाजतोय. या चित्रपटातील प्रत्येक भूमिकेची प्रेक्षकांमध्ये चर्चा आहे. 'तान्हाजी'मध्ये रायबा मालुसरेची भूमिका आरुष नंद या बालकलाकाराने साकारली आहे. नऊ वर्षीय आरुषने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत काजोल आणि अजय देवगण यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव सांगितला. 'तान्हाजी' चित्रपटात काम करण्याविषयी तो म्हणाला, "काजोल आणि अजय सरांसोबत काम करण्याचा अनुभव अविस्मरणीय होता. सेटवर अजय सर नेहमीच शांत असायचे तर काजोल मॅडम खूप बडबड करायच्या. चित्रपटातील गाण्यात अजय सरांनी मला त्यांच्या खांद्यावर उचलून घेतल्याचं दृश्य होतं. त्यावेळी मी जेवलो की नाही असं काजोल मॅडम मला विचारत होत्या. मी जेवलो असतो तर मला उचलण्यासाठी अजय सरांना आणखी ताकद लावावी लागली असती, अशा शब्दांत त्यांनी मस्करी केली. त्यावेळी सेटवर त्या जोरजोरात हसू लागल्या होत्या. त्यांच्यामुळे सेटवरील वातावरण हलकंफुलकं राहायचं." आणखी वाचा : 'तान्हाजी'ने बॉक्स ऑफिसच्या गडावर रचले हे विक्रम आरुषने याआधी 'नीरजा', 'फोबिया', 'परी', 'डिअर जिंदगी', 'ट्युबलाइट', 'परमाणू' या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. जॉन अब्राहम, सलमान खान, सोनम कपूर यांसारख्या बड्या कलाकारांसोबत त्याने स्क्रीन शेअर केली आहे. रायबाच्या भूमिकेसाठी आरुषने घरुनच एक व्हिडीओ पाठवला होता. त्यावेळी परीक्षा सुरू असल्याने तो ऑडिशनसाठी जाऊ शकला नव्हता. 'तान्हाजी' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईचा २०० कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे. प्रेक्षक-समीक्षकांकडून या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. ओम राऊत दिग्दर्शित या चित्रपटात अजय देवगण, काजोल, सैफ अली खान यांच्या मुख्य भूमिका आहेत.