‘बिग बॉस ११’चे पर्व बऱ्याच कारणांनी चर्चेत आहे. विकास गुप्ता, शिल्पा शिंदे, हिना खान, अर्शी यांच्यात दरदिवशी खटके उडतच असतात. पण, काही प्रसंगी मात्र हे वाद इतक्या विकोपास जातात की, त्याचा उपयोग कार्यक्रमाचा टीआरपी वाढवण्यासाठी नक्कीच होतो. टीआरपीच्या शर्यतीत आपल्या अनोख्या स्वरुपामुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या ‘बिग बॉस’च्या या घरात आता टेलिव्हिजन अभिनेत्री हिना खान आणि ‘भाभीजी..’ फेम शिल्पा शिंदे यांच्यात पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे.

‘बिग बॉस’च्या घरात स्पर्धक नेहमीच काही कामं वाटून घेतात. कामाच्या या विभागणीत शिल्पा बऱ्याचदा स्वयंपाकघराची जबाबदारी सांभाळताना दिसते. पण, तिच्यावर अर्शी आणि हिना मात्र नाराज असल्याचं लक्षात येत आहे. ‘बिग बॉस’च्या ट्विटर अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आलेल्या एका व्हिडिओमध्ये जेवणासाठी नळाचे पाणी वापरण्याच्या मुद्दयावरुन त्यांच्यात भांडण झाल्याचं लक्षात येतंय. शिल्पा जेवणासाठी नळाचं पाणी वापरत असल्याचं अर्शीकडून हिनाला जेव्हा कळलं तेव्हा ती तडक स्वयंपाकघराकडे गेली आणि तिने शिल्पाला पाणी न वापरण्याचा सल्ला दिला.

वाचा : ‘जब वी मेट’मधील गीतचा प्रियकर आठवतोय…

नळाचं पाणी आरोग्यासाठी हानिकारक नसतं. कारण, आपण पाणी उकळल्याशिवाय वापरत नाही, असं शिल्पाने पटवून सांगितल्यानंतरही हिनाने तिला ‘आरओ’तील पाणी वापरण्याचा सल्ला दिला. मात्र, त्यावेळी हिनाचा आवाज चढला होता. त्यामुळे यापुढे कधीही स्वयंपाकघरात न येण्याचा निर्णय शिल्पाने अखेर घेतला. कोणीतरी दुसऱ्याने ही जबाबदारी घ्यावी, पण यापुढे मी स्वयंपाकघराची जबाबदारी घेणार नाही, असं तिने स्पष्ट केलं. मुख्य म्हणजे विकास गुप्ताही हा सर्व वाद सुरु असताना त्याच ठिकाणी उपस्थित होता, त्यामुळे या वादाला वेगळंच वळण मिळालं. लहानमोठ्या कारणांमुळे ‘बिग बॉस’च्या घरात नेहमीच खटके उडाल्याचं पाहायला मिळालं आहे. पण, यंदाच्या पर्वात स्पर्धकांमध्ये असणारे मतभेद आणि वारंवार त्यांच्यात होणारे वाद या साऱ्यामुळे भल्याभल्या कार्यक्रमांना, मालिकांना ‘बिग बॉस’ चांगलंच आव्हान देतोय हे नाकारता येणार नाही.