अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्याप्रकरणाची केंद्रीय तपास यंत्रणेकडून म्हणजेच सीबीआयकडून चौकशी करण्याच्या मागणीचा पाठपुरावा करणारे भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी आता आणखीन एक धक्कादायक वक्तव्य केलं आहे. सुशांत आत्महत्याप्रकरणासंदर्भात सुरुवातीपासूनच शंका उपस्थित करणाऱ्या स्वामी यांनी आता सुशांतच्या मृतदेहावर करण्यात आलेल्या शवविच्छेदनासंदर्भात शंका उपस्थित केली आहे. स्वामी यांनी सुशांतचे शवविच्छेदन झालेल्या कूपर रुग्णालयातील डॉक्टरांचीही सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी चौकशी करावी अशी मागणी ट्विटरवरुन केली आहे. नक्की वाचा >> “सुशांत सिंह मृत्यूप्रकरणी आदित्य आणि राऊत यांची नार्को टेस्ट करा सगळं सत्य समोर येईल” "सुशांतच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करणाऱ्या डॉ. सी. आर. कूपर महापालिका रुग्णालयातील पाच डॉक्टरांची सीबीआयने चौकशी केल्यास बरीच माहिती मिळेल. सुशांतचा मृतदेह रुग्णालयामध्ये नेणाऱ्या रुग्णवाहिकेमधील कर्मचाऱ्यांच्या माहितीनुसार पाय मुरगळलेल्या अवस्थेत होते. मृतदेहाचा घोट्याखालील पायाचा भाग हा मुरगळल्याप्रमाणे होता," असं स्वामी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. CBI will find it worthwhile to grill the Dr. R.C. Cooper Muncipal Hospital the five doctors who did the autopsy. According to the Ambulance staff that took SSR’s body to the hospital, SSR’s feet was twisted below his ankle (as if it was broken). Case is unravelling!! — Subramanian Swamy (@Swamy39) August 10, 2020 स्वामी यांचे हे ट्विट प्रचंड व्हायरल झालं आहे. १४ तासांमध्ये २० हजारहून अधिक जणांनी ते रिट्विट केलं आहे. स्वामी यांनी अशाप्रकारे यापूर्वीही सुशांतच्या आत्महत्येसंदर्भातील ट्विट केले आहेत. यामध्ये अगदी “मला असं का वाटतंय की सुशांतची हत्याच झाली आहे”पासून ते "बॉलिवूडचे तीन खान म्हणजेच सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर खान हे सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येच्या घटनेबाबत शांत का?" असे अनेक ट्विट त्यांनी मागील काही आठवड्यांमध्ये केले आहेत. सुशांत प्रकरणाच्या सीबीआय चौकशीसाठी सुब्रमण्यम स्वामी प्रयत्न करत होते. यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र देखील लिहिलं होतं. अखेर पाच ऑगस्ट रोजी केंद्र सरकारने सीबीआय़ चौकशीसाठी मान्यता दिली. “केंद्र सरकारने सुशांत मृत्यू प्रकरणाच्या चौकशीची जबाबदारी सीबीआयकडे सोपवली आहे. मी माझ्या वचनाची पूर्तता केली का? आता मी फ्री आहे का?” अशा आशयाचं ट्विट करुन त्यांनी समाधान व्यक्त केलं होतं. त्यांच्या या ट्विटवर “नाही सर तुमचं काम अद्याप संपलेलं नाही. सीबीआय या प्रकरणाला जिया खान केससारखं हाताळू शकते. हा लढा अद्याप संपलेला नाही.” अशा आशयाचं ट्विट करुन कंगनाने प्रतिक्रिया दिली होती. यावेळेस ट्विटवर No Sir हा हॅशटॅगही ट्रेण्ड झाला होता. स्वामी यांनी या प्रकरणावर लक्ष ठेऊन सुशांतला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी सुशांतच्या चाहत्यांनी केली आहे.