करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर जेईई आणि नीट परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी अनेकांकडून केली जात आहे. यामध्ये आता बॉलिवूड अभिनेता सोनू सूदचाही नंबर लागला आहे. सोनू सूदने ट्विट करत केंद्र सरकारला परीक्षा पुढे ढकलली जावी अशी विनंती केली आहे. करोना संकटात आपण विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालता कामा नये असं त्याने म्हटलं आहे.

सोनू सूदने ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “देशातील सध्याची परिस्थिती पाहता जेईई आणि नीट परीक्षा पुढे ढकलली जावी अशी माझी भारत सरकारला विनंती आहे. सध्याच्या करोना स्थितीत आपण विद्यार्थ्यांबद्दल जास्त काळजी घेणं गरजेचं असून त्यांना संकटात टाकू नये”.

परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होत असताना केंद्र सरकार मात्र परीक्षा घेण्याच्या निर्णयावर ठाम आहे. सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीतही न्यायालयाने परीक्षा घेतली पाहिजे असा निर्वाळा दिला आहे. यादरम्यान स्वीडनची १७ वर्षीय पर्यावरण प्रेमी ग्रेटा थनबर्गने हिनेही परीक्षा घेण्याच्या निर्णयावर टीका केली आहे. करोना संकटात विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यास सांगणं अन्यायकारक असल्याचं ग्रेटा थनबर्गने म्हटलं आहे. तिने ट्विट करत आपलं मत मांडलं आहे.

परीक्षा वेळेतच होणार; NTA कडून शिक्कामोर्तब
राष्ट्रीय सामाईक प्रवेश परीक्षा (जेईई) आणि राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET UG) वेळेतच होणार असल्याचं नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (एनटीए) सांगण्यात आलं आहे. एनटीएकडून वेबसाईटवर यासंबंधी अधिकृत माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. एनटीएने जेईई मुख्य परीक्षा ठरल्याप्रमाणे १ ते ६ सप्टेंबर दरम्यान होणार असल्याचं सांगितलं आहे. जेईई मुख्य परीक्षेसोबत नीट परीक्षाही वेळेतच होणार आहे. ही परीक्षा १३ सप्टेंबरला होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

आदित्य ठाकरेंचं मोदींना पत्र
परीक्षांमुळे विद्यार्थ्यांना करोना होण्याचा धोका असल्याचे लक्षात घेऊन सर्व परीक्षा, व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या नीट, जेईई, सीईटीसारख्या प्रवेश परीक्षा पुढे ढकलाव्यात आणि देशातील विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून सध्याचे जूनपासून सुरू झालेले नवे शैक्षणिक वर्ष जानेवारी २०२१ पासून सुरू करावे, अशी मागणी पर्यावरणमंत्री आणि युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

देशभरात प्रत्यक्ष वा ऑनलाइन परीक्षांसाठी सुरू असलेली प्रक्रि या, विविध व्यावसायिक अभ्यासक्र मांची प्रवेश प्रक्रि या स्थगित करून ती पुढे ढकलावी. त्याचबरोबर जून २०२० पासून नवे शैक्षणिक वर्ष सुरू होऊन दोन महिने उलटले असले तरी करोनामुळे शाळा-महाविद्यालये सुरू करता आलेली नाहीत. त्यामुळे शैक्षणिक वर्ष वाया जात आहे. देशभरातील कोटय़वधी विद्यार्थ्यांचे हे नुकसान टाळण्यासाठी शैक्षणिक वर्ष जानेवारी २०२१ पासून सुरू करण्याबाबत विचार करावा, अशी विनंतीवजा मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे.