करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात असून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वारंवार फेसबुकवरुन संवाद साधत लोकांना संयम राखण्याचं आवाहन करत महत्त्वाचे निर्णय आणि सूचनांची माहिती देत आहेत. उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने परिस्थिती हाताळत आहे त्याचं सर्वच स्तरातून कौतुक केलं जात आहे. फक्त सर्वसामान्य नाही तर सेलिब्रेटीही जाहीरपणे उद्धव ठाकरे यांचं कौतुक करत आहेत. प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनीही उद्धव ठाकरे कौतुकास पात्र असल्याचं सांगत त्यांना सलाम केला आहे. जावेद अख्तर यांनी ट्विटरच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंचं कौतूक केलं आहे. जावेद अख्तर यांनी म्हटलं आहे की, "उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात महाराष्ट्र सरकार ज्या पद्धतीने करोना व्हायरसंबंधी स्पष्ट निर्देश देत परिस्थिती हाताळत आहे ते कौतुकास पात्र आहे. माझा सलाम". Maharashtra Govt under leadership of CM Uddhav Thackray needs to be congratulated for handling the Covid 19 with clear directives. My salute . — Javed Akhtar (@Javedakhtarjadu) April 4, 2020 जावेद अख्तर नेहमीच आपल्या परखड आणि स्पष्ट मांडत असतात. याआधी त्यांनी सर्व धार्मिक स्थळं बंद असताना काही मशिदींमध्ये नमाज पठण सुरु असल्यावरुन टीका केली होती. यावेळी त्यांनी मशिदी बंद करण्याची मागणी केली होती. काय म्हणाले होते जावेद अख्तर ? “जोपर्यंत करोनाचं संकट आहे तोपर्यंत सर्व मशिदी बंद करण्यात याव्यात असा दारूल देवबंदनं फतवा काढण्याची मागणी एक स्कॉलर आणि अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष ताहीर महमूद यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीचं मी समर्थन करतो. जर काबा आणि मदिना येथील मशिदी बंद होऊ शकतात तर भारतातील का नाही,” अशा आशयाचं ट्विट जावेद अख्तर यांनी केलं होतं.