देशात सध्या लष्कराची गरज असल्याचं ऋषी कपूर यांनी म्हटलं आहे. करोनाच्या पार्श्वभुमीवर देशात आणीबणी जाहीर करा अशी मागणी ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर यांनी केली आहे. देशात आज हे होत आहे, उद्या काय होणार आहे? अशी भीती ऋषी कपूर यांनी व्यक्त केली आहे. तसंच देशात सध्या लष्कराची गरज असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. करोनाच्या पार्श्वभुमीवर ऋषी कपूर सध्या ट्विटरवर आपलं मत उघडपणे मांडत आहेत. याआधी त्यांनी राज्य सरकारने मद्यविक्री सुरू ठेवावी अशी मागणी केली होती. ऋषी कपूर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “देशात आज हे होत आहे, उद्या काय होणार आहे? म्हणूनच आपल्याला सैन्याच्या मदतीची गरज आहे असं मी म्हणतो आहे. आणीबाणी”. Aaj ye hua kal kya kya hona hai? That is why I said we need the military out. Emergency. — Rishi Kapoor (@chintskap) March 31, 2020 याआधी ऋषी कपूर यांनी ‘राज्य सरकारला उत्पादन शुल्क विभागाकडून पैशांची फार गरज आहे. संतापात नैराश्याची भर पडू नये. जसे आधी मद्यपान करायचे तसे लोक करतच आहेत तर कायदेशीर करून टाका. ढोंगीपणा करू नका. असे माझे विचार आहेत’, असं त्यांनी ट्विटरवर म्हटलं होतं. त्यांच्या या ट्विटमुळे नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोलसुद्धा केलं होतं. लॉकडाउनला कोणीच गंभीरपणे पाहत नाही, सेलिब्रिटीसुद्धा नाही, असं एका युजरने म्हटलं होतं तर काहींनी त्यांची खिल्लीसुद्धा उडवली होती. आणखी वाचा : 'स्टार वॉर्स' फेम अभिनेता अँड्र्यू जॅकचा करोना व्हायरसमुळे मृत्यू तसंच ऋषी कपूर यांनी निकृष्ट मास्कची निर्मिती होत असल्याचा एक व्हिडीओ शेअर करत तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली होती. हा व्हिडीओ पत्रकार मधू तेहरान यांनी शेअर केला होता.