‘हिरॉईन’ चित्रपटानंतर दिग्दर्शक मधुर भांडारकरने आपल्या आगामी चित्रपटाची सुरुवात करण्यासाठीही आधीच फार वेळ घेतला आहे. पण, कथा मान्य झाली, नाव जवळजवळ निश्चित झाले तरी चित्रपटाची नायिका कोण, यावरून मधुरचा गोंधळ सुरूच आहे. दीपिका पदुकोण आणि करीना कपूर यांच्यापैकी आपल्या चित्रपटाची नायिका कोण असावी, यावर अजून त्याचा खल सुरूच आहे. खुद्द दीपिका आणि करीना दोघीही चित्रपटासाठी तयार होऊन बसल्यात. किंबहुना नेहमीच्या परिपाठाप्रमाणे दीपिका करीनाच्या तोंडचा हाही चित्रपट पळवणार अशी चर्चा आहे.
‘हिरॉईन’मध्ये करीना मुख्य भूमिकेत होती. हा चित्रपट सपशेल आपटला. पण, चित्रपटाच्या अपयशाला दिग्दर्शक कारणीभूत आहे. करीनाचा अभिनय उत्तम होता, अशी टीका समीक्षकांनी केली. त्यामुळे आपल्या आगामी चित्रपटासाठी अजूनही मधुरकडे करीनाचा पर्याय उपलब्ध आहे. सध्या ती फारसे चित्रपटही करत नसल्याने तिच्या तारखांचीही अडचण नाही. याऊलट, बॉलिवूडचे गेले वर्ष गाजवणाऱ्या दीपिकाकडे यावर्षी तर चित्रपटांची रांगच लागली आहे. पण, एवढी व्यग्र असूनही दीपिकाला मधुरचा चित्रपट सोडायचा नाही. त्यासाठी तिचा खटाटोप चालला आहे. त्यामुळे मधुरची मात्र चांगलीच पंचाईत झाली आहे.
दीपिकाने याआधीही करीनाचे चित्रपट पळवले आहेत. म्हणजे पहिले करीनाने नकार दिला म्हणून ते चित्रपट दीपिकाच्या पदरात पडले. पण, आता तिच्या यशामुळे पुढचे चित्रपटही तिच्याचकडे वळत आहेत. त्यामुळे करीनाचे तोंडचे पाणी पळाले आहे. भन्साळींच्या ‘राम लीला’ मधून करीना बाहेर पडली आणि तिथे दीपिकाची वर्णी लागली. त्या चित्रपटाने दीपिकाचे नाव नायकांच्या यादीत आणून बसवले. रोहित शेट्टीची पसंती असूनही करीनाने ‘चेन्नई एक्स्प्रेस’ला लाल दिवा दाखवला. शेवटी ‘चेन्नई एक्स्प्रेस’ दीपिकाच्या दारात उभी राहिली आणि या चित्रपटाने दीपिकाला बॉलिवूडची ‘नंबर वन’ करून टाकले. आताही भन्साळींच्या ‘बाजीराव मस्तानी’ या बहुचर्चित चित्रपटासाठी कोणे एकेकाळी त्यांनी करीनाचा विचार केला होता. तिथेही आता दीपिकाचीच वर्णी लागली आहे. त्यामुळे मधुरचा चित्रपटही दीपिकाच घेणार अशी चर्चा सुरू आहे. पण, अजूनतरी निर्णय मधुरच्या हातातच असल्याने आपल्या ‘हिरॉईन’ला साथ द्यायची की दीपिकाचा हात धरायचा, कोणाचा सोडला तर काय होईल आणि धरला तर काय होईल, अशी कोडी सोडवत तो बसला आहे.