संजय लीला भन्साळीच्या ‘राम-लीला’ चित्रपटापासून सुरू झालेली दीपिका पडुकोण-रणवीरसिंग यांची प्रेमकहाणी आता निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपली आहे. पुढच्या वर्षी ते विवाहबंधनात अडकणार असल्याची जोरदार चर्चा आहे. विशेष म्हणजे भन्साळींच्याच ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटाच्या चित्रिकरणानिमित्ताने हे दोघेही तब्बल १५० दिवस एकत्र येणार असून त्याचवेळी त्यांच्या विवाहाची तारीख निश्चित होईल असे समजते.
दीपिका आणि रणवीर यांच्या प्रेमकहाणीला ‘राम-लीला’च्या सेटवरच सुरुवात झाली होती. मात्र, याआधी प्रेमात चांगलेच टक्केटोणपे खाल्लेल्या दीपिकाने यावेळी फार सावध भूमिका घेतली होती. ‘राम-लीला’चे चित्रिकरण पूर्ण झाल्यानंतर रणवीरला आपल्या दीपिकाबद्दलच्या भावना लपवणे कधी जमले नाही. मात्र, आपल्या चित्रपटांपेक्षा प्रेमलीलांचीच चर्चा जास्त होते आहे हे लक्षात आल्यानंतर दीपिकाने रणवीरला याबाबतीत चांगलीच तंबी दिली होती. माध्यमांसमोर आपण एक मेकांचे चांगले मित्र आहोत, हे दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्या या जोडीने बाहेर परदेशात एकत्र फिरणे मात्र थांबवले नाही की लपवलेही नाही. तरीही ते दोघे सांगत नाहीत तोर्पयंत त्यांच्या या नात्याची खातरजमा होत नव्हती. पण, रणवीरच्या ‘दिल धडकने दो’ या चित्रपटाचे चित्रिकरण इटलीत सुरू असताना दीपिका थेट तिथे सेटवर येऊन थडकल्यानंतर या दोघांच्या नात्याबद्दल सगळ्यांची खात्री पटली.
दीपिकासाठी रणवीरने ‘फाईंडिंग फॅनी’ या चित्रपटात तिच्या नवऱ्याची एक छोटी भूमिकाही साकारली आहे. दीपिकाच्या सर्वात जवळ असणाऱ्या दिग्दर्शकाने रणवीर आणि ती एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले असून पुढच्या वर्षी विवाह करण्याचा त्यांचा मानस असल्याचे सांगितले आहे. लग्न कधी करायचे याबद्दल अजून त्यांची निश्चिती झालेली नाही. पण, ‘दिल धडकने दो’ संपल्यानंतर भन्साळींच्याच ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटासाठी ते पुन्हा एकत्र येणार आहेत. तेव्हाच विवाहाबद्दलचा अंतिम निर्णय हे दोघेही घेतील, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. एकीकडे रणबीर आणि कतरिनाही पुढच्या वर्षीपर्यंत विवाहबंधनाच्या तयारीत असल्याची चर्चा होत असतानाच दीपिका आणि रणवीरच्या विवाहाचीही लगबग सुरू होणे हा निव्वळ योगायोग असावा!