कधी कधी हिट्सपेक्षा अपयशी चित्रपट तुमच्यासाठी अधिक संधी उपलब्ध करून देतात, अशी प्रतिक्रिया अभिनेता शाहिद कपूरने दिली आहे. २०११ मध्ये ‘मौसम’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरला असला तरी त्यानंतर आपल्याला तब्बल १८ चित्रपटांच्या ऑफर मिळाल्या, असा खुलासा शाहिदने केला आहे.   त्यामुळे फक्त चित्रपट यशस्वी झाला तरच तुमच्यासाठी संधी निर्माण होतात असे नाही, तर त्या चित्रपटातील तुमच्या भूमिकेवरही बरेच काही अवलंबून असते, असे त्याने सांगितले.
बॉलीवूडमध्ये मी सर्व प्रकारच्या परिस्थितीचा अनुभव घेतला आहे. ‘विवाह’ चित्रपटाच्या आधी जवळपास सहा महिने माझ्याकडे कामच नव्हते, नंतर ‘मौसम’च्या अपयशानंतर मला १८ चित्रपटांच्या ऑफर आल्याने मला आश्चर्याचा धक्काच बसला.
नुकताच प्रदर्शित झालेल्या आर.राजकुमार या चित्रपटाच्या यशाने तो खूश असल्याचे त्याने सांगितले. गेल्या दोन वर्षांपासून त्याच्या चित्रपटांना फारसे यश मिळत नव्हते. पण या चित्रपटाला चाहत्यांनी दिलेल्या प्रतिसादाने आनंदी असल्याचे शाहिद म्हणाला.