अभिनेत्री जुही चावला ही गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपटांमध्ये फार क्वचित काम करत आहे. बॉलिवूडमधील करिअर शिखरावर असताना तिने १९९५ मध्ये व्यावसायिक जय मेहताशी लग्न केलं. त्यांना जान्हवी आणि अर्जुन अशी दोन मुलं आहेत. नव्वदच्या दशकात जुहीच्या सौंदर्यावर, तिच्या हास्यावर सगळेच फिदा होते. बॉलिवूडचा ‘दबंग खान’ अर्थात सलमानसुद्धा जुहीच्या प्रेमात होता. इतकंच नव्हे तर त्याने जुहीच्या वडिलांकडे तिच्याशी लग्न करण्याची मागणी घातली होती.

एका जुन्या मुलाखतीत खुद्द सलमानने याचा खुलासा केला होता. या मुलाखतीत सलमानने जुही चावलाची खूप प्रशंसादेखील केली. “जुही खूप चांगली आणि सुंदर मुलगी आहे. मी तिच्या वडिलांकडे तिच्यासोबत लग्न करण्याची इच्छादेखील व्यक्त केली होती. मात्र त्यांनी मला नकार दिला”, असं त्याने सांगितलं. जुहीच्या वडिलांनी का नकार दिला असं विचारल्यावर त्याने पुढे म्हटलं, “कदाचित त्यांना मी योग्य वाटलो नसेन.”

आणखी वाचा : प्रभूदेवा दुसऱ्यांदा बांधणार लग्नगाठ?

जुहीने जय मेहताशी गुपचूप लग्न केलं होतं. फक्त ठराविक लोकांनाच तिच्या लग्नाची माहिती होती. लग्नाबद्दल समजल्यानंतर करिअरला ब्रेक लागू नये म्हणून गुपचूप लग्न केल्याची कबुली तिने नंतर एका मुलाखतीत दिली.