लवकरच दुसऱ्या पर्वासह नव्या दमाने सुरुवात तरुण-तरुणी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय असलेली ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘दिल दोस्ती दुनियादारी’ही मालिका अल्पविराम घेणार आहे. अल्पविरामानंतर लवकरच पुन्हा एकदा मालिकेचे नवीन भाग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. मालिकेतील कलाकारांनी गुरुवारी डोंबिवलीत झालेल्या एका कार्यक्रमात ही घोषणा केली. ही मालिका सध्या कमालीची लोकप्रिय असून मालिकेतील ‘कैवल्य’, आशू’, ‘सुजय’, ‘अॅना’, ‘रेश्मा’, ‘मीनल’ या सर्व पात्रांनी प्रत्येक महाविद्यालयीन विद्यार्थी आणि विद्यार्थीनींच्या मनात घर केले आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये या मालिकेची विशेष हवा आहे. लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाच काही काळासाठी ही मालिका बंद केली जाणार आहे. डोंबिवलीतील एका कार्यक्रमात मालिकेतील ‘कैवल्य’सह सर्व कलाकारांनी ही मालिका लवकरच बंद होणार असल्याची घोषणा व्यासपीठावरुन केली. मालिका बंद होणार असल्याची घोषणा होताच उपस्थित तरुण-तरुणी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये क्षणभर शांतता पसरली. पण त्यानंतर लगचेच ‘हा अल्पविराम आहे, आम्ही पुन्हा तुमच्या भेटीला येणार आहोत, असे जाहीर करताच टाळ्यांचा कडकडाट आणि शिटय़ांच्या आवाजात याचे उपस्थितांकडून स्वागत झाले.