पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांज शनिवारी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सिंधू बॉर्डरवर पोहचला. त्यानंतर थंडीमध्ये आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यासाठी दिलजीतनं एक कोटी रुपयांची रक्कम दान केली आहे. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना थंडीपासून आराम मिळण्यासाठी स्वेटर किंवा चादर खरेदी करण्यासाठी दिलजीतनं एक कोटी रुपयांची रक्कम दिली आहे. याबाबतचा खुलासा पंजबी गायक सिंघा यांनी केला आहे. सिंघा यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडीओत दिलजीतनं एक कोटी रुपये दान केल्याची माहिती दिली. तसेच आंदोलनाला पांठिबा दिल्याबद्दलही दलजीतचे आभारही व्यक्त केले आहेत.

शनिवारी शेतकरी आंदोलनाला पांठिबा देण्यासाठी पोहचलेला दिलजीत म्हणाला की, ‘ प्लीज, शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्या इतकीच आमची विनंती आहे. येथे शेतकरी शांततेत आंदोलन कतोय. संपूर्ण देश शेतकऱ्यांसोबत आहे.’

कडाक्याच्या थंडीमध्येही तुम्ही आंदोलन करत आहात. सर्व शेतकऱ्यांना माझा सलाम आहे. शेतकऱ्यांनी नवीन इतिहास लिहिला आहे. येणाऱ्या पिढीला हा इतिहास सांगितला जाईल. शेतकऱ्यांच्या अडचणी कोणीही वाढवू शकत नाही, असेही दिलजीत म्हणाला.

दरम्यान, नुकतेच बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आणि दिलजीत दोसांज या दोघांमध्ये शेतकरी आंदोलनावरुन ट्विटर वॉर झालं होतं. आंदोलनकर्त्या एका वृद्ध महिलेविषयी कंगानानं आक्षेपार्ह ट्विट केलं होतं. त्यावर दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला होता.