बॉलिवूडच्या इतिहासातील सर्वाधिक गाजलेल्या चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणजे ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’. अभिनेता शाहरुख खान आणि काजोल यांच्या करिअरमधील मैलाचा दगड ठरलेल्या या चित्रपटाचं आजही प्रेक्षकांच्या मनावर गारुड आहे. ‘बडे बडे देशो मे ऐसी छोटी छोटी बाते होती रहती है सेनोरिटा’, असे म्हणत प्रेक्षकांच्या भेटीला येणारा शाहरुख खान अनेकांच्या मनात घर करुन गेला. मात्र, या चित्रपटात रोमॅण्टीक सीन देण्यासाठी शाहरुखने सुरुवातीला नकार दिला होता हे फार कमी जणांना माहित असेल.

अभिनेता शाहरुख खान याला डीडीएलजे या चित्रपटामध्ये रोमॅण्टिक सीन करण्याची इच्छा नव्हती असा उल्लेख अनुपमा चोप्रा यांच्या पुस्तकात असल्यासं सांगण्यात येत. खरंतर रोमॅण्टिक सीन न करण्यामागे शाहरुखची काही कारणं होतं. त्यातील एक मुख्य कारण म्हणजे आमिर खान आणि सलमान खान.

आणखी वाचा- सिनेमाचं सेलिब्रेशन! काजोल- शाहरुखनं सोशल हॅण्डलमध्ये केला ‘हा’ बदल

त्याकाळी सलमान आणि आमिर खासकरुन रोमॅण्टिक सीनसाठीच ओळखले जात होते. त्यामुळे त्यांच्याप्रमाणेच भूमिका करण्यापेक्षा शाहरुखला काही तरी हटके आणि वेगळ्या धाटणीची भूमिका करण्याची इच्छा होती. सोबतच चित्रपटात मुलीला घेऊन पळून जाणं त्याला मान्य नव्हतं. विशेष म्हणजे शाहरुखची समजूत काढण्यासाठी दिग्दर्शक आदित्य चोप्रा यांना तब्बल तीन आठवडे प्रयत्न करावा लागला.

आणखी वाचा- मराठा मंदिरामध्ये २० वर्षांहून अधिक काळ ‘डीडीएलजे’ दाखवणारा जबरा फॅन!

दरम्यान, करण -अर्जुन या चित्रपटाचं चित्रीकरण सुरु असताना शाहरुखचं मत परिवर्तन झालं आणि त्याने दिलवाले दुल्हनियाँ ले जाऐंगे चित्रपटासाठी होकार दिला. आज या चित्रपटाला २५ वर्ष पूर्ण झाली. विशेष म्हणजे हा चित्रपट त्याकाळी तुफान लोकप्रिय झाला आणि आजही त्याची जादू प्रेक्षकांच्या मनावर कायम असल्याचं पाहायला मिळतं.