गेल्या अनेक वर्षांपासून मराठी चित्रपटसृष्टी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचे निधन झाले. त्यानंतर कलाविश्वातील अनेकांनी शोक व्यक्त केला. विजू मामा यांच्या जाण्याने रंगभूमी पोरकी झाली अशा शब्दांत काहींनी भावना व्यक्त केल्या. मात्र यावरच संताप व्यक्त करत विजय चव्हाण आजारी असताना त्यांना किती कलाकार भेटले असा सवाल दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांनी केला आहे. फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांनी फटकारले आहे. 'रंगभूमीवरील प्रत्येक व्यक्ती तुमचा मामा किंवा मावशी कशी होते आणि आणि दर आठवड्याला कोणा मामा किंवा मावशीचं निधन होत असल्यास रंगभूमी पोरकी कशी काय होते? जेव्हा विजू मामा रुग्णालयात होते, तेव्हा तुम्ही त्यांना भेटायला गेला होतात का? आता उमेश कामत तुमचे मामा आणि स्पृहा जोशी तुमची आत्या होणार का? सई ताम्हणकर ही तुमची मावशी होणार का? पुन्हा यानंतर अमेय वाघ मामा आणि पर्ण पेठे मावशी होणार का? ही कशाप्रकारची मूल्यं आहेत. रंगभूमी पोरकी झाली, हे किती तथ्यहिन आणि रटाळ वाक्य आहे,' या शब्दांत त्यांनी सुनावले आहे. एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर शोक कसा व्यक्त करतात हे तरी निदान शिकून घ्या, असंही त्यांनी या फेसबुक पोस्टअखेर म्हटलं आहे. विजय चव्हाण हे गेल्या कित्येक दिवसांपासून आजारी होते. त्यावेळी कोणी त्यांची भेट घेतली का, अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली.