जवळपास सात वर्षांपूर्वी अभिनेता अजय देवगण व निर्माता आदित्य चोप्रा यांच्यात चित्रपटांमुळे वाद निर्माण झाला होता. एकाच दिवशी अजयचा ‘सरदार’ व आदित्य चोप्रा निर्मित ‘जब तक है जान’ हे चित्रपट प्रदर्शित करण्यात आले आणि नंतर हा वाद कोर्टात पोहोचला. या कारणांमुळे काजोल व चोप्रा कुटुंबाच्या नात्यातही कटुता निर्माण झाली होती. चुलत बहिणी काजोल व राणी मुखर्जी एकमेकींशी बोलतही नव्हत्या. आता अनेक वर्षांनंतर दुर्गापूजेनिमित्त बॉलिवूडच्या या दोन अभिनेत्री वितुष्ट विसरुन एकत्र आल्या आहेत. दुर्गापूजेसाठी काजोल, तिची बहिण तनिषा व आई चोप्रा कुटुंबीयांकडे आल्या होत्या. सोशल मीडियावर त्यांचे एकत्र फोटोसुद्धा व्हायरल झाले आहेत.

‘कुछ कुछ हौता है’ या चित्रपटात काजोल व राणीने एकत्र काम केलं होतं. या चित्रपटातील त्यांचा सहकलाकार शाहरुख खान व निर्माता-दिग्दर्शक करण जोहरनेही या दोघींमधील वाद मिटवण्याचा अनेकदा प्रयत्न केला होता. पण ते काही शक्य झालं नव्हतं. दुर्गापूजेनिमित्त का होईना हळूहळू या दोन कुटुंबातील वाद मिटू लागले आहेत असं चित्र दिसून येत आहे.

आणखी वाचा : ‘बाहुबली २’चा ‘हा’ अभूतपूर्व विक्रम हृतिक-टायगरचा ‘वॉर’ मोडणार का?

दुर्गापूजेचे काही फोटो काजोलने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. या फोटोवर अनेकांनी दोघींना पुन्हा एकदा एकत्र रुपेरी पडद्यावर पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे.