अभिनेत्री तापसी पन्नू आणि अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेला ‘बदला’ चित्रपट पुढील महिन्यात प्रदर्शित होत आहे. ‘कहानी’ चित्रपटाचे दिग्दर्शक सुजॉय घोष या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्याही खूप अपेक्षा या चित्रपटाकडून आहेत. बऱ्याच वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये क्राइम- थ्रिलर पाहायला मिळणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्येही या चित्रपटाबद्दल खूपच कुतूहल आहे. पण हा चित्रपट पाहताना क्षणभरही लक्ष विचलित करू नका अन्यथा तुम्हाला चित्रपट कळणार नाही असा सल्ला तापसीनं दिला आहे.

‘आतापर्यंत तुम्ही पाहिलेल्या चित्रपटापेक्षा हा चित्रपट खूपच वेगळा आहे. हा क्राइम- थ्रिलर आहे त्यामुळे चित्रपट नीट लक्ष देऊ पाहा. एक मिनिटंही चुकवलं तरी तुम्हाला चित्रपटाची कथा काहीच कळणार नाही.’ असा सल्ला तापसीनं दिला आहे. एका खूनाच्या आरोपात तापसी अडकते. यातून ती बाहेर कशी येते वकीलाच्या भूमिकेत असलेले अमिताभ बच्चन तापसीला यातून बाहेर कसे काढतात, ही मर्डर मिस्ट्री कशी उलगडते हे ‘बदला’ चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

८ मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ‘पिंक’ चित्रपटानंतर दुसऱ्यांदा तापसी आणि अमिताभ बच्चन एकत्र काम करत आहेत.