करोना व्हायरसमुळे सध्या देशभरातील लोक त्रस्त आहेत. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने २१ दिवसांचा लॉकडाउन जारी केला आहे. मात्र लॉकडाउनच्या काळात घरी बसून काय करावं? असा प्रश्न देशभरातील लोकांना पडला आहे. या प्रश्नाचं उत्तर म्हणून सरकारने ‘रामायण’ व ‘महाभारत’ यांसारख्या गाजलेल्या मालिका पुन्हा एकदा सुरु केल्या आहेत. या यादीत आता ‘ब्योमकेश बक्क्षी’ आणि ‘सर्कस’ या आणखी दोन मालिकांची भर पडली आहे. या लोकप्रिय मालिका प्रेक्षकांच्या आग्रहास्तव पुन्हा एकदा सुरु करण्यात आल्या आहेत.

‘ब्योमकेश बक्क्षी’ ही मालिका रोज सकाळी ११ वाजता दूरदर्शन वाहिनीवर दाखवली जात आहे. तर ‘सर्कस’ मालिका रात्री आठ वाजता दाखवली जात आहे. दूरदर्शनच्या ट्विटर हँडलवरुन याबात माहिती देण्यात आली.

‘ब्योमकेश बक्क्षी’ ही ९०च्या दशकातील लोकप्रिय मालिका आहे. ही मालिका प्रसिद्ध बंगाली लेखक शरदेंदु बंद्योपाध्याय यांच्या डिटेक्टिव्ह कथानकांवर आधारित आहे. या मालिकेत अभिनेता रजित कपूर यांनी ‘ब्योमकेश बक्क्षी’ ही व्यक्तिरेखा साकारली होती. आजही ही मालिका प्रेक्षकांमध्ये तितकीच लोकप्रिय आहे.