कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देशात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. या लॉकडाउनच्या काळात अत्यावश्यक सेवा सोडल्या तर सारे काही बंद ठेवण्यात आले आहे. अशा कठिण काळात प्रेक्षकांचे मनोरंजन व्हावे म्हणून दूरदर्शन वाहिनीवरील ८० ते ९० च्या काळातील गाजलेल्या मालिका 'रामायण', 'महाभारत', 'ब्योमकेश बक्शी' आणि 'सर्कस' पुन्हा दाखवण्यात येत आहेत. आता त्याच काळातील प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणारी मालिका 'श्रीमान श्रीमती' पुन्हा दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वच जण आनंदी झाले आहेत. ९०च्या दशकात 'श्रीमान श्रीमती' या मालिकेने आपला वेगळाच प्रेक्षक वर्ग निर्माण केला होता. या मालिकेतील केशव कुलकर्णी, कोकिला कुलकर्णी, चिंटू दिलरुबा, फिल्मस्टार प्रेमा शालिनी, गोखले, शर्माजी ही पात्र आजही लोकांच्या चांगलीच लक्षात आहेत. त्यामुळे 'रामायण', 'महाभारता'नंतर या मालिकेची मागणी सोशल मीडियावर होऊ लागली. दूरदर्शनवर प्रदर्शित होणाऱ्या या मालिकेत जतीन कनकिया, रीमा लागू, राकेश बेदी, अर्चना पूरण सिंह हे प्रमुख भूमिकेत होते. आता ते पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. आणखी वाचा : रामायणातील ‘सीता’ आता कशी दिसते? तुम्हीच पाहा… मकरंद अधिकारी यांची 'श्रीमान श्रीमती' ही मालिका एप्रिल महिन्यात दूरदर्शन वाहिनीवर दुपारी २ वाजता प्रदर्शित होणार आहे. पण प्रदर्शनाची तारिख अद्याप समोर आलेली नाही. या मालिकेसोबतच 'चाणक्य' ही मालिका देखील एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून डीडी भारती या वाहिनीवर सुरु होणार आहे. त्याचबरोबर प्रेक्षकांच्या मागणीनुसार शक्तिमान ही मालिका देखील पुन्हा प्रदर्शित होणार आहे. ही मालिका दूरदर्शनवर एप्रिल महिन्यापासून दूपारी एक वाजता लागणार आहे.