छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यानंतर संभाजी महाराजांची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत झालेले डॉ. अमोल कोल्हे हे मनोरंजन विश्वाला रामराम ठोकणार अशा चर्चा होत्या. मात्र अमोल कोल्हे यांनी हे वृत्त फेटाळून लावलं आहे. मालिका सोडण्याचा विचार नाही किंवा तसा निर्णयही झालेला नाही तेव्हा अफवांवर विश्वास ठेवू नका अशी विनंती त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे केली आहे. अमोल कोल्हे यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि आठवड्याभरातच राजकारणात सक्रीय होण्यासाठी ते 'स्वराज्य रक्षक संभाजी' ही मालिका सोडणार अशा चर्चांना पेव फुटलं. झी मराठीवर अमोल कोल्हे यांची 'स्वराज्य रक्षक संभाजी' ही मालिका सुरू आहे. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद या मालिकेला लाभला आहे. संभाजी महाराजांचा इतिहास या मालिकेतून उलगडला आहे. टीआरपीच्या यादीतही ही मालिका पहिल्या पाच क्रमांकामध्ये आहे, मात्र राजकारणात अधिक लक्ष घालण्यासाठी अमोल कोल्हे ही मालिका सोडणार अशा चर्चा सुरू झाल्या. अखेर फेसबुक पोस्टद्वारे अमोल कोल्हे यांनी चर्चा खोडून काढल्या आहेत. 'मालिका सोडण्याचा कोणताही निर्णय किंवा विचारही झालेला नाही. छत्रपती संभाजी महाराज यांचा खरा इतिहास स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतून जगासमोर मांडण्याचे कार्य अविरत चालू राहील. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका' असं अमोल कोल्हे यांनी फेसबुक पोस्टद्वारे स्पष्ट केलं आहे.