डॉ. प्रवीण भुजबळ व विजय तिवारी निर्मित आणि रोहन सातघरे दिग्दर्शित ‘एक होतं पाणी’ हा पाणी समस्येसारख्या ज्वलंत सामाजिक विषयावर भाष्य करणारा चित्रपट येत्या १० मे पासून महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. अनेक चित्रपट महोत्सवांत यशस्वी मोहोर उमटवणाऱ्या ‘एक होतं पाणी’ या चित्रपटाने ‘अंबरनाथ चित्रपट महोत्सवा’मध्ये तब्बल ६ नामांकनं पटकावली होती. त्यातील दोन पुरस्कारांवर म्हणजेच ‘सर्वोत्कृष्ट कथा-आशिष निनगुरकर’ आणि ‘सर्वोत्कृष्ट बाल कलाकार चैत्रा भुजबळ’ या पुरस्कारांवर आपला ठसा उमटवला तर ‘नोएडा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल’ व ‘इंडियन वर्ल्ड फिल्म फेस्टिवलमध्ये’ विशेष लक्षवेधी परीक्षक पसंती या पुरस्काराने या चित्रपटाला सन्मानित करण्यात आले. नुकत्याच झालेल्या पहिल्या अहमदनगर फिल्म फेस्टिवलमध्ये या चित्रपटाला ‘सर्वोत्कृष्ट सामाजिक आशय चित्रपट’, सर्वोत्कृष्ट खलनायक व सर्वोकृष्ट पोस्टर असे पुरस्कार मिळाले.

एक होता राजा.. एक होती राणी. उद्या म्हणू नका ‘एक होतं पाणी’ अशी हटके टॅगलाईन असणारा हा चित्रपट सध्या मराठी चित्रपटसृष्टीत कौतुकाचा विषय ठरत आहे. दर्जेदार निर्मितीमूल्य, उत्तम कथानक आणि प्रतिभावान कलाकारांच्या अचूक समीकरणाने सिनेसृष्टीतील मान्यवरांसोबतच रसिक-प्रेक्षकांचीही शाबासकी मिळवेल अशी निर्माता-दिग्दर्शकांना आशा आहे. आशिष निनगुरकर यांच्या लेखणीतून आकारास आलेला हा विषय समाजाच्या डोळ्यांत जळजळीत अंजन घालणारा असून सद्यस्थितीला धरून आहे. सामाजिक बांधिलकी जपत आपलं भविष्य आपल्याच हाती आहे हा संदेश ‘एक होतं पाणी’ अधोरेखित करतो. ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ची सध्या नितांत गरज असून ‘एक होतं पाणी’ म्हणण्याची वेळ येऊ देण्यापूर्वीच त्याविषयी समाजात जागरूकता घडवून आण्यासाठी हा चित्रपट नक्कीच मदतशील ठरेल.

‘एक होतं पाणी’ या चित्रपटात हंसराज जगताप, उपेंद्र दाते, अनंत जोग, जयराज नायर, गणेश मयेकर, रणजित जोग, श्रिया मस्तेकर, रणजित कांबळे, त्रिशा पाटील, शीतल कल्हापुरे, शीतल शिंगारे, आनंद वाघ, नाना शिंदे, अनुराधाभावसार, डॉ राजू पाटोदकर, राधाकृष्ण कराळे, दिपज्योती नाईक, बालकलाकार चैत्रा भुजबळ आदि कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका पाहायला मिळतील. या चित्रपटाचे छायाचित्रण योगेश अंधारे यांनी केले असून हा चित्रपट १० मेपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.