केळकर इंडस्ट्रीजचे सदानंद केळकर यांचा त्या दिवशी वाढदिवस होता. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनीही फोन करावा, इतके ते प्रतिष्ठित. परंतु ते मात्र कुठल्यातरी वेगळ्याच कारणांनी अस्वस्थ होते. एका पार्सलची त्यांना प्रतीक्षा होती. पण त्या दिवशी ते आलंच नाही. दरवर्षी येणारं हर्षदाचं शुभेच्छापर चित्र न आल्याने केळकरांच्या मनात शंकाकुशंकांनी गर्दी केलेली. हर्षदाने यंदा का पाठवलं नसेल शुभेच्छाचित्र? ती सुखरूप असेल ना? की तिच्या बाबतीत काहीतरी अशुभ घडलंय? इतकी वर्षे तिचा काहीच ठावठिकाणा नाही. पण आपल्या वाढदिवशी मात्र ती न चुकता स्वत: चितारलेलं चित्र पाठवीत असते. पण प्रत्येक वेळी वेगवेगळ्या ठिकाणांहून. त्यामुळे तिला हुडकून काढणंही अशक्य झालेलं. पण ती कुठं का असेना, सुखरूप आहे, हा दिलासा मात्र तिच्या शुभेच्छाचित्रातून मिळतो. मग या वर्षी तिचं शुभेच्छाचित्र का आलं नाही?

बेचैन झालेले सदानंद केळकर पंधरा वर्षांनंतर पुन्हा एकदा नव्याने हर्षदाचा शोध घेण्यासाठी प्रसिद्ध शोधपत्रकार अजित चिटणीसची मदत घ्यायचं ठरवतात. त्याकरता त्याला बोलावणं धाडतात. पण उपलब्ध माहितीवरून हर्षदाचा माग काढणं अशक्य आहे हे त्याच्या लक्षात येतं. तो तसं त्यांना स्पष्टपणे सांगून ही कामगिरी स्वीकारण्यास नकार देतो. केळकरांनी त्यासाठी भरभक्कम रक्कम ऑफर केलेली असतानाही! खरं तर अजितने गौप्यस्फोट केलेल्या एका उद्योगपतीच्या आर्थिक घोटाळ्याशी संबंधित दाव्यात तो पुरेशा पुराव्यांअभावी सिद्ध होऊ न शकल्याने अजितला त्यांना दहा कोटीची नुकसानभरपाईची रक्कम द्यायची असते. ही रक्कम तो उभी करू शकत नसल्याने त्याचं भविष्य अंध:कारमय असतं. ही माहिती केळकरांनी नेहा सबनीस या हॅकरच्या मदतीने आधीच काढलेली असते. हर्षदाचा ठावठिकाणा शोधून काढल्यास आपण ही रक्कम त्याला मेहनताना म्हणून देऊ, असा प्रस्ताव केळकर अजितपुढे ठेवतात. तेव्हा मात्र त्याला आपल्या निर्णयाचा फेरविचार करण्याशिवाय गत्यंतर उरत नाही.

अजित आपल्या पद्धतीने या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी कंबर कसतो. त्यासाठी प्रथम केळकर कुटुंबातील मंडळींची तो माहिती तो गोळा करू लागतो. सदानंद केळकर हे विनापत्य असले तरी त्यांच्या भावाला- पूर्णानंदांना दोन मुलं असतात. पैकी एक हर्षदा. दुसरा- मंदार. जो सध्या केळकर इंडस्ट्रिजचा कारभार पाहतो आहे. पूर्णानंदांचा नदीत तोल जाऊन पडल्याने काही वर्षांपूर्वी मृत्यू झाला आहे. सदानंदांचा तिसरा भाऊ एका धार्मिक संघटनेशी संबद्ध आहे. त्याच्याशी बोलावं म्हणून अजित त्यांच्या घरी गेलेला असताना त्याने केळकर कुटुंबीयांच्या भानगडीत पडू नये असं ते त्याला बजावतात. साहजिकच त्यांच्याकडे संशयाची सुई निर्देश करते. परंतु ठोस पुरावा हाती लागल्याविना कुठल्याही निष्कर्षांपर्यंत यायचं नाही, या मताचा अजित असतो. त्याला हर्षदा प्रकरणाशी संबंध असावा असा एक कागद हाती लागतो. त्यावर काही सांकेतिक आकडे असतात. त्यांची उकल करताना या आकडय़ांचा मनुस्मृतीशी संबंध असल्याचे त्याला समजते. मनुस्मृतीतील स्त्रीविषयक विशिष्ट श्लोकांचा त्या आकडय़ांतून निर्देश होतो. स्त्रीचं पुरुषसत्ताक समाजातील हीन स्थान, तिच्या वर्तनव्यवहाराबद्दलचे कठोर नीतिनियम यासंबंधीचे ते श्लोक असतात. त्या श्लोकांसमोर काही इंग्रजी आद्याक्षरंही असतात.  त्यांचा उलगडा करता अजितच्या ध्यानात येतं, की ती पुरुषी अत्याचारांत बळी गेलेल्या स्त्रियांच्या नावांची आद्याक्षरं आहेत. पण या साऱ्याचा हर्षदाच्या अचानक गायब होण्याशी काय संबंध? की तीही अशा पूर्वनियोजित कटाची बळी आहे?

अजितला त्याच्या या शोधकामात माहिती विश्लेषणासाठी एका मदतनीसाची गरज असते. केळकरांचे पी. ए. शिंदे त्याला ‘हॅकर’ नेहा सबनीसचं नाव सुचवतात. तिनंच अजितच्या पूर्वेतिहासाची माहिती केळकरांना काढून दिलेली असते. तिच्या या हुशारीने थक्क झालेला अजित तिला आपली साहाय्यक म्हणून स्वीकारतो.

दरम्यान, काही विचित्र घटना घडत जातात. सदानंद केळकरांना भीषण अपघात होतो. अजितवरही कुणी अज्ञात इसम गोळ्या झाडतो. त्यात तो जखमी होतो. याचाच अर्थ हर्षदा प्रकरणातील गुन्हेगार आसपासच कुठेतरी आहे हे अजितच्या ध्यानी येतं. तो यथावकाश त्याचा माग काढत त्याच्यापर्यंत पोहोचतोही. परंतु..

स्त्रीला दुय्यम दर्जाची उपभोग्य वस्तू समजणाऱ्या प्रवृत्तीविरोधात लेखक सुदीप मोडक यांनी ‘एक शून्य तीन’ हे नाटक लिहिलं आहे. मात्र ते रहस्यमयतेच्या अंगाने मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. त्यासाठी आवश्यक कथानक त्यांनी बेतलं आहे. ते करताना अनेक कच्चे दुवे संहितेत राहून गेले आहेत; ज्यामुळे हे बेतलेपण उघड होतं. अजित हे पात्र शोधपत्रकारितेतील अव्वल नाव असल्याचं म्हटलं जात असलं तरी त्यांचं करतुक इथं फारसं जाणवत नाही. अजितपेक्षा नेहा सबनीस ही हॅकरच या कामासाठी जास्त योग्य होती असं वाटत राहतं. दुसरं म्हणजे या नेहाचीही एक गोष्ट यात आहे. ती एक अनाथ मुलगी आहे. न कळत्या वयात तिने आपल्या वडिलांचा खून केला होता. (अर्थात त्याला तसं कारणही होतंच.) मात्र, आता तिचा काका किशोर हा तिचं शोषण करतो आहे. मुख्य कथानकास समांतर जाणारी कथा दाखविण्याचा जरी यात लेखकाचा हेतू असला, तरी ही कथा पचवणं अंमळ जडच जातं. कारण नेहासारखी अत्यंत बुद्धिमान मुलगी आपलं असं शोषण होऊ देईल हे संभवत नाही. अगदी तिच्यावर गुन्हेगार म्हणून पूर्वी शिक्का बसलेला असला, तरीही. हर्षदा प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याने तो अर्धवट का सोडला, हेही नाटकात पुरेसं स्पष्ट होत नाही. सदानंद केळकरांचे पी. ए. शिंदे हे नेहाच्या संपर्कात कसे व कोणत्या कारणाने आले, हे समजत नाही. दुसरं म्हणजे अशी तेजतर्रार, बुद्धिमान मुलगी हर्षदा प्रकरणाचा छडा लावण्यास सक्षम आहे, हे माहीत असताना तिच्याऐवजी अजितला का पाचारण केलं जातं? हर्षदा ज्या कारणास्तव गायब झाली, ते माहीत असूनही तिची आई मूग गिळून कशी गप्प बसते? या सर्व प्रश्नांची पटण्याजोगी कारणमीमांसा नाटकात सापडत नाही. त्यामुळे हा ‘एक उत्तम, पण बेतलेला प्रयोग’ आहे अशी या नाटकाबद्दल धारणा बनते.

दिग्दर्शक नीरज शिरवईकर व सुदीप मोडक यांनी संहितेतील कच्चे दुवे तसेच राहू दिल्याने एक उत्तम रहस्यनाटय़ यापलीकडे प्रयोगाचा परिणाम जात नाही. शिरवईकरांनी नेपथ्यातून पडिक बंगल्याची जीर्णावस्था यथातथ्य दाखवली आहे. गुन्हेगार वापरत असलेल्या गोदामातील भयसूचक वस्तूही गूढतेत भर घालणाऱ्या आहेत. रोहित प्रधान यांनी पाश्र्वसंगीतातून नाटय़ांतर्गत गूढता ठळक केली आहे. जयदीप आपटे यांनी प्रकाशयोजनेतून रहस्यमयतेला पोषक वातावरणनिर्मिती केली आहे.

नाटकात प्रत्येकाने आपली भूमिका चोख केली आहे. स्वानंदी टिकेकरांनी साकारलेली नेहा बुद्धिचातुर्य व सतर्कतेचा मिलाप असलेली आहे. हर्षदा प्रकरणाची तड लावण्यासाठीची तळमळ सुमीत राघवन (अजित) यांनी पुरेपूर व्यक्त केली आहे.  नम्रता कदम यांनी अनिताची भूमिका केली आहे. हतबल सदानंद केळकरांच्या भूमिकेत गुरुराज अवधानी चपखल बसलेत. केळकरांचे पी. ए. झालेल्या  संजय देशपांडे यांनी आपल्या संशयास्पद हालचालींनी संशयितांच्या यादीत भर घातली आहे. नेहाच्या विकृत काकाच्या (किशोर) रूपात सागर आठलेकर जास्तच कृतकतेकडे झुकलेत. सुदीप मोडक यांचा मंदार पहिल्यापासूनच संशयास्पद राहील याची दक्षता  त्यांनी घेतली आहे. त्यामुळे मग रहस्य उरतं ते फक्त हर्षदाच्या गायब होण्यामागील कारणाचं आणि नाटकाच्या नावाचंच!