आधुनिकतेबरोबर माणसाचे जीवनदेखील खूप व्यस्त होत चालले आहे. या व्यस्त जीवनशैलीचा थेट परिणाम त्याच्या लग्न करण्यावर होऊ लागल्याचे दिसते. होय! याच कारणामुळे टीव्ही मालिकांची सम्राज्ञी एकता कपूर आणि अभिनेता तुषार कपूरला लग्नाचा विचार करायलादेखील वेळ मिळत नाहीये. या विषयी बोलताना अभिनेता जितेंद्र म्हणाले, एकता आणि तुषार ही त्यांची दोन्ही मुले कामात खूप व्यस्त असून, त्यांना लग्नाचा विचारदेखील करायला वेळ नाही. प्रत्येक वडिलांना त्यांची मुले प्रिय असल्याचे मत व्यक्त करीत ते गंमतीने म्हणाले, बाप म्हणून आपल्याला त्यांच्याविषयी चांगलेच बोलायला हवे, अन्यथा त्यांचा मार खावा लागेल. ते पुढे म्हणाले, वडील म्हणून मुलांची खूप काळजी वाटते, जी मरेपर्यंत वाटत राहील. आजचा काळ हा ठरवून लग्न करण्याचा काळ नाही. त्यांना स्वतःलाच त्यांचा जोडीदार निवडावा लागेल. परंतु, ते त्यांच्या कामात एवढे व्यस्त आहेत, की त्यांना लग्नाचा विचार करायला देखील वेळ नाही. याबाबत मी काहीही करू शकत नाही, जे काही करायचे आहे ते त्यांनीच करायचे आहे.