बॉलीवूडचा सिरियल किसर इमरान हाश्मी लवकरच ‘हमारी अधुरी कहानी’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात करणार आहे. परंतु, या चित्रपटाची कथा ऐकल्यानंतर यात काम करण्यासाठी ‘सावध’ पवित्रा घेतला असल्याचे इमरानने म्हटले आहे.
याचे स्पष्टीकरण देताना इमरान म्हणाला की, या चित्रपटाची कथा अतिशय मनोरंजक आहे. तसेच संपूर्णपणे प्रेमकथेवर आधारलेला हा माझा पहिला चित्रपट असेल. चित्रपटकर्ते महेश भट्ट यांनी वाचून दाखविलेल्या या कथेनुसार त्यातील नायकाने निभावलेली भूमिका साकारणे माझ्यासाठी आव्हानात्मक आहे. त्यामुळे ही भूमिका साकारताना मला सावध पवित्रा धारण करावा लागणार असल्याचे इमरान म्हणाला. अशा प्रकारची भूमिका मी याआधी साकारलेली नसल्याचेही तो म्हणाला.
दिग्दर्शक मोहीत सुरी या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याची शक्यता आहे. हमारी अधुरी कहानी मध्ये इमरानसोबत अभिनेत्री विद्या बालन आणि अभिनेता राजकुमार राव देखील असणार आहे.