‘हेरा फेरी’ हा बॉलिवूड इतिहासातील आजवरच्या सर्वोत्कृष्ट विनोदीपटांपैकी एक म्हणून ओळखला जातो. जबरदस्त डायलॉग आणि अफलातून कथानकामुळे हा चित्रपट आजही प्रेक्षकांना तितकाच खळखळवून हसवतो. प्रेक्षकांच्या आग्रहास्तव या चित्रपटाचा तिसरा भाग लवकरच चाहत्यांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटात अभिनेता इशा गुप्ता देखील झळकणार होती. परंतु काही कारणास्तव तिला ‘हेरा फेरी ३’ मधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. नेमक असं काय झालं ज्यामुळे इशाला चित्रपटातून बाहेर केलं?

 

View this post on Instagram

 

A post shared by Esha Gupta (@egupta) on

इशाने बॉलिवूडलाईफला दिलेल्या मुलाखतीत आपल्या फिल्मी करिअरवर गप्पा मारल्या. या मुलाखतीत तिने हेरा फेरीचा किस्सा सांगितला. ती म्हणाली, “२०१५ मध्ये हेरा फेरीच्या तिसऱ्या भागासाठी मी ऑडिशन दिलं होतं. त्यावेळी दिग्दर्शक निरज वोहरा यांनी माझी निवड देखील केली होती. त्यानंतर दोन वर्ष मी हेरा फेरी टीमच्या संपर्कात होते. २०१७ मध्ये निरज वोहरा यांचं निधन झालं. तेव्हापासून टीममधील कुठल्याही व्यक्तीने माझ्याशी संपर्क साधला नाही. दरम्यान फोनवरुनच मला ‘हेरा फेरी ३’ मधून बाहेर काढण्यात आल्याची माहिती मिळाली. मी या चित्रपटात काम करण्यासाठी प्रचंड उत्सुक होते. निरज वोहरा यांना माझा अभिनय आवडला होता त्यामुळे त्यांनी माझी निवड केली परंतु आता कोणी दुसराच दिग्दर्शक हा प्रकल्प हाताळणार आहे त्यांना माझा अभिनय आवडला नसावा असं मला वाटतं. परंतु याबाबत कुठलीही अधिकृत माहिती अद्याप मला मिळालेली नाही.”

ईशा गुप्ता एक बॉलिवूड अभिनेत्री आहे. २०१२ साली ‘जन्नत २’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर ‘रुस्तम’, ‘राज ३’, ‘बेबी’, ‘हमशकल’, ‘कमांडो २’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये तिने काम केले. ईशा चित्रपटांमधील हॉट सीन्समुळे प्रचंड चर्चेत असते. अभिनयासोबत ती फॅनश मॉडलींग क्षेत्रातही कार्यरत आहे.