मराठी चित्रपटसृष्टीतील सध्याची प्रसिद्ध जोडी उर्मिला आणि आदिनाथ कोठारे हे लवकरच आई-बाबा होणार असल्याचे काही दिवसांपूर्वीच सगळ्यांना कळले. याच वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘करार’ चित्रपटानंतर उर्मिला कोणत्याच कार्यक्रमात किंवा समारंभात दिसली नाही. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच उर्मिलाने अचानक तिचा एक फोटो इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर शेअर केला. लखनवी गाऊनमधील फोटो शेअर करत तिने ‘नशिबाने दोन गोड बातम्या एकत्रच आल्या आहेत’, असे लिहिले होते. लग्नाला तब्बल पाच वर्षे उलटल्यानंतर उर्मिला आणि आदिनाथने बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला.

पहिलं बाळ हे प्रत्येक दाम्पत्याच्या आयुष्यात नवे अनुभव घेऊन येतं. आपल्या आयुष्यातील या नव्या पर्वाचा अनुभव ‘लोकसत्ता ऑनलाइन’शी शेअर करताना उर्मिला म्हणाली, मी आणि आदिनाथने अत्यंत विचारपूर्वक हा निर्णय घेतला. आपण आई-बाबा होण्याची हीच योग्य वेळ आहे, असे आम्हाला दोघांनाही वाटले. अपघाताने काही घडले किंवा आता घरचे म्हणताहेत म्हणून आपण विचार करुया, असे आमच्या बाबतीत घडले नाही. या दिवसांचा मी पुरेपूर आनंद घेतेय. मुळात आदिनाथ आणि मी बाळासाठी मानसिक दृष्ट्या तयार आहोत. त्यामुळे येणारा प्रत्येक दिवस खास असतो. आमच्या दोघांच्याही आयुष्यात एक मोठा बदल घडणार आहे. नवरा-बायकोच्या नात्यापुढे जाऊन आम्ही आता आई-बाबा होणार आहोत.

वाचा : राणाचा ‘ही’च्यात जीव रंगला…

आपल्या आरोग्याविषयी उर्मिला म्हणाली, डॉक्टरांनी सर्व काही सुरळीत असल्याचे सांगितलंय. त्यामुळे काळजी करण्याचं तसं काही कारण नाही. या दिवसांमध्ये मूड स्विंग होणे स्वाभाविक असते. याचा फटका आदिनाथला रोज बसतो. पण तरीही तो माझे सर्व लाड पुरवतो. मला जी गोष्ट हवी असते ती तो माझ्यासमोर आणून ठेवतो.

उर्मिला उत्तम अभिनेत्री तर आहेच त्याचसोबत ती एक नृत्यांगनासुद्धा आहे. सिल्क एरियल योगमध्ये ती तरबेज आहे. आता गरोदरपणात सिल्क एरियल योग आणि नृत्य या गोष्टी करता येत नसल्या तरी ती आजही क्लासमधल्या मुलांना शिकवायला जाते. डॉक्टरांनी अॅक्टिव्ह राहण्याचा सल्ला दिल्यामुळे घरी बसून न राहता क्लासला जाण्याचा दैनंदिन उपक्रम सुरु असल्याचे उर्मिलाने सांगितले. त्यासोबत ती रोज योगासनही करते. विशेष म्हणजे आता डाएट बंद असल्यामुळे हवे ते खाता येते यामुळे खूप खूश असल्याचे उर्मिला म्हणाली.

वाचा : बळीराजासाठी रितेशचं गणपती बाप्पाला साकडं

‘प्रत्येक स्त्रिच्या आयुष्यातील हा अत्यंत सुंदर टप्पा असतो. याचा आनंद आपण घेतला पाहिजे. स्त्रिच्या आयुष्यातील हा खूप मोठा बदल असल्यामुळे मानसिकदृष्ट्या तयार झाल्यानंतरच स्त्रियांनी हा निर्णय घ्यावा, असे मला वाटते. बाळाला जन्म देण्यासाठी मनाची तयारी असणे फार गरजेची असते. गरोदरपणातील प्रत्येक दिवसाचा आनंद लुटा आणि अजिबात काळजी करू नका, असा सल्लाही उर्मिलाने दिलाय.

चैताली गुरव, chaitali.gurav@indianexpress.com