मराठी रंगभूमीला गौरवशाली परंपरा लाभली आहे. अनेक प्रतिभावान नाटककारांनी, लेखक, दिग्दर्शकांनी आपल्या वैविध्यपूर्ण नाट्यकृतींनी प्रेक्षकांची मने जिंकत रंगभूमीचा एक काळ अक्षरशः गाजवला. पण आता सिनेमा, मालिकांच्या जगात नाटक कुठेतरी मागे पडतंय, असंच अनेकांना वाटत आहे. तरुण पिढी काही नाटकांकडे वळत नाही अशी तक्रार अनेकांकडून येत असते. पण, वर्तमानपत्रातल्या जाहिराती पाहिल्या की नवनवीन येणाऱ्या नाटकांच्या जाहिरातीच हे सर्व किती फोल आहे हे दाखवून देतात. नुकतेच 'अपराध मीच केला' हे जुने नाटक नव्या रुपात रंगभूमीवर आले. या नाटकातल्या आपल्या अनुभवाबद्दल सांगतेय अभिनेत्री निशा परुळेकर. 'मी नाटकात काम करायला सुरुवात तशी उशिराच केली. मधल्या काळात मी कोणत्याच नाटकात काम केले नाही. 'सही रे सही' या नाटकात मी एक बदली कलाकार म्हणून काम केलं होतं. त्यामुळे अनेक दिवसांपासून मी एखाद्या विनोदी नाटकाच्या शोधात होते. पण विजय गोखले यांनी 'अपराध मीच केला' या नाटकाची संहिता मला वाचायला दिली, तेव्हा मी या नाटकाच्या प्रेमातच पडले. या नाटकातले प्रत्येक संवाद खरंच खूप सुंदर आहेत. मधुसूदन कालेलकरांनी हे नाटक फार सुरेख लिहिलं आहे. नाटक वाचून झाल्यावर मी लगेच विजय गोखलेंना फोन केला आणि या नाटकात काम करण्याची इच्छा व्यक्त केली. या नाटकाची बांधणी खूप सुंदर केली आहे. ५० हूनही अधिक वर्षांपूर्वी लिहिलेलं हे नाटक आजच्या पिढीसाठी समर्पक आहे. नाटकाच्या मूळ संहितेमध्ये आम्ही कोणताही बदल केलेला नाही. पण दोन अंकी नाटक करायचे असल्यामुळे काही भाग कमी करावा लागला. अनेकदा जुनं नाटक नव्याने रंगभूमीवर आणायचं असेल तर त्यात काही बदल करावे लागतात. पण कालेलकरांनी फार दूरदृष्टीने हे नाटक लिहिलं असंच म्हणावं लागेल. मालिका, सिनेमा मी आतापर्यंत करतच आले होते पण मला मनापासून पुन्हा रंगभूमीकडे वळायचे होते. रंगभूमीवर काम करण्याची मजा दुसऱ्या कोणत्याच माध्यमात येऊ शकत नाही असं मला वाटतं. नाटकात तुमच्या अभिनयाला जी दाद मिळते ती कलाकाराला वेगळं समाधान देऊन जाते. म्हणूनच विक्रम गोखले, प्रशांत दामले यांसारखे कलाकार आजही नाटकांमध्ये काम करतात. प्रशांत दामले आणि नाटक या दोन गोष्टी तर वेगळ्या करताच येणार नाही. हार्ट सर्जरी झाल्यानंतरही प्रशांत सातत्याने नाटकात काम करत आहेत. रंगभूमीची ती एक जादू आहे, असं मला वाटतं. तिच्यावर मनापासून प्रेम केलं की तीही तुम्हाला भरभरुन देते. प्रेक्षकांचं ते थेट प्रेम मालिका, सिनेमांमध्ये मिळत नाही. 'सही रे सही' हे नाटक जेव्हा मी करत होते तेव्हा नाटक संपल्यानंतर प्रेक्षक भरतलाच भेटायचे आणि ते साहजिकच होतं. पण भरतला भेटून झाल्यानंतर जेव्हा प्रेक्षक माझ्याकडे येऊन 'तुमचंही काम आवडलं' असं प्रांजळपणे सांगायचे, नाटक सुरु असताना जेव्हा तुमच्या वाक्याला किंवा तुमच्या एन्ट्रीला टाळ्या येतात ते दिवस मी विसरु शकत नाही. शब्दांकन- मधुरा नेरुरकर madhura.nerurkar@indianexpress.com