समाजातल्या अनेक अनिष्ट रुढी-परंपरा, अंधश्रद्धा यांच्यावर भाष्य करणाऱ्या अनेक चित्रपटांची आजवर निर्मिती झाली आहे. या यादीमध्ये मराठी चित्रपटांचाही समावेश करण्यात आला आहे. असंख्य मराठी चित्रपटांतून या अपप्रवृत्तींवर कडाडून टिका करण्यात आली आहे. अशाच एका गोष्टीचा वेध घेत, राजकीय नेते आणि समाजव्यवस्थेकडून फसवणूक झालेल्या कुटुंबाची कथा ‘फांदी’ या आगामी मराठी चित्रपटातून आपल्यासमोर येणार आहे. या चित्रपटाचा संगीत प्रकाशन सोहळा नुकताच थाटात संपन्न झाला असून अजित साबळे दिग्दर्शित हा चित्रपट येत्या २० जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये मनोरंजनाच्या माध्यमातून परिणामकारकरित्या चित्रपटाची गोष्ट मांडण्यात येणार आहे. त्यामुळे 'फांदी' या चित्रपटातून श्रद्धा व अंधश्रद्धेच्या मानवी खेळाचा वेध घेता येणार आहे. ‘फांदी’ या पहिल्या कलाकृतीचा आशय प्रेक्षकांपर्यंत प्रभावीपणे पोहचेल असा विश्वास चित्रपट दिग्दर्शक अजित साबळे यांनी व्यक्त केला असून त्यांनी चित्रपटाला सहकार्य केलेल्या प्रत्येकाचे आभार मानले आहेत. कुणाल-करण लिखित ‘देवा सांग ना तू कुठे गेला’, ‘मला भेटा ना दुपारी’, ‘किमया झाली गावामंदी’ अशी कथेला पूरक तीन गाणी या चित्रपटात आहेत. आदर्श शिंदे, बेला शेंडे, नागेश मोरवेकर या गायकांनी स्वरबद्ध केलेल्या या गीतांना कुणाल-करण यांनीच संगीतबद्ध केलं आहे.