करोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने संपूर्ण देशात २१ दिवसांचा लॉकडाउन जारी केला. लॉकडाउनमुळे घरात बसलेल्या लोकांचे मनोरंजन व्हावे या उद्देशाने दूरदर्शनवरील ‘रामायण’ ही लोकप्रिय मालिका पुन्हा एकदा सुरु करण्यात आली. दरम्यान केंद्रिय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी रामायणबाबत एक ट्विट केले होते. या ट्विटवरुन बॉलिवूड दिग्दर्शक फराह खान हिने जावडेकरांवर जोरदार टीका केली.

काय म्हणाले होते प्रकाश जावडेकर?
प्रकाश जावडेकर यांनी टीव्हीवर रामायण पाहात असतानाचा एक फोटो ट्विट केला होता. “मी रामायण पाहात आहे. तुम्ही?” अशी कॉमेंट त्यांनी या फोटोवर केली होती. मात्र या ट्विटवरुन फराहने जावडेकरांवर निशाणा साधला.

“देशातील लोक करोना विषाणूमुळे हैराण झाले आहे. अन्न पाण्यावाचून प्रवास करत आहेत. अशी प्रतिकूल परिस्थिती असताना मी मात्र तुम्हाला घरी बसून आराम करताना पाहात आहे.” अशा आशयाचे ट्विट करुन फराहने जावडेकरांवर जोरदार टीका केली.

देशभरातील जनता आज करोना विषाणूमुळे त्रस्त आहे. या पार्श्वभूमीवर फराहने केलेले हे ट्विट सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. फराहनंतर देशभरातील अनेकांनी प्रकाश जावडेकरांवर टीका केली. वाढत्या टिकेमुळे अखेर त्यांनी ते ट्विट डिलीट केले.