भारतातील सर्वात आघाडीचा सेलिब्रिटी फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जी यांनी नव्या पिढीच्या महिलांवर टीका केली आहे. जर तुम्हाला साडी कशी नेसतात हे माहितीच नसेल तर तुम्हाला लाज वाटली पाहिजे असं सब्यसाची हावर्ड इंडिया कॉन्फरन्समध्ये म्हणाला आणि त्याच्या या विधानावरून अनेक महिला नाराज झाल्या आहेत.

आजच्या तरुणींना साडी नेसता येत नाही किंवा त्यांना साडी नेसायला आवडत नाही यावरून त्यानं आजच्या पिढीच्या महिलांवर नाराजी दर्शवली आहे. ‘जर एखाद्या महिलेनं मला येऊन सांगितलं की मला साडी नेसता येत नाही तर मी त्याक्षणी तिला म्हणेल की तूला हे सांगताना लाज वाटायला हवी. साडी हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे त्यामुळे प्रत्येक महिलेनं साडीला महत्त्व दिलंच पाहिजे.’ हावर्ड इंडिया कॉन्फरन्समध्ये बोलताना त्यानं हे मत मांडलं आहे. त्यानं दीपिकाचं उदाहरणही दिलं. दीपिका ज्या कार्यक्रमाला जाते तिथे ती साडीच नेसूनच जाते याकडेही त्यानं अनेकांचं लक्ष वेधलं. साडी हे जगातलं सर्वात सुंदर वस्त्र आहे, अनेक विदेशी लोकदेखील साडीचं कौतुक करतात. अनेकींना साडीत वावरणं कठीण वाटतं त्यामुळे त्या साडी नेसत नाहीत पण, पूर्वीच्या महिलांनी साडीतच युद्ध लढली आहेत याचा मात्र अनेकींना विसर पडतो. साडीबद्दल आजच्या महिलांच्या मनात काही पूर्वग्रह आहेत ते त्यांनी खोडून काढले पाहिजे आणि प्रत्येकीने आपली संस्कृती जोपासली पाहिजे असंही तो म्हणाला.

सब्यसाची हा बॉलिवूडमधल्या अभिनेत्रींचा आवडता फॅशन डिझायनर झाला आहे. अनुष्का- विराटच्या लग्नात सब्यसाचीनं दोघांचे आऊटफिट डिझाइन केले होते आणि याची चर्चा फॅशनविश्वात चांगलीच रंगली होती. दीपाकाबरोबरच आजच्या घडीला ऐश्वर्या, श्रीदेवी, अनुष्का अनेकींची पहिली पसंती ही सब्यसाचीच्या साड्यांना आहे.