त्रिपूरा पोलिसांत सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अपमास्पद गाणे रचल्याचा आरोप करत बांग्लादेशी गायक मेनुल एहसान नोबल उर्फ नोबल विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नोबलने गेल्यावर्षी सा रे गा मा पा या शोमध्ये सहभाग घेतला असून तो टॉप तीनमध्ये पोहोचला होता.

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, गुजरातमधील गांधीनगर शहरातील एका विद्यार्थाने नोबल विरोधात तक्रार केली आहे. या विद्यार्थाने नाव सुमन पाल असे असून नोबलने पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांचा अपमान करणारे गाणे सोशल मीडियावर शेअर केल्यामुळे त्याने ही तक्रार केली आहे. तक्रारीनंतर बांग्‍लादेशी गायक मेनुल एहसान नोबेलवर कलम ५००, ५०४, ५०५ आणि कलम १५३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुमनने एक ट्विट केले आहे. त्यामध्ये त्याने ‘मी मेनुल एहसान नोबल विरोधात तक्रार केली आहे. मी उच्च न्यायालयाला विनंती करतो की त्याचा भारतीय विजा रद्द करण्यात यावा. त्याच्यासोबत असलेले अनेक कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्यात यावे. जेणे करुन तो पुन्हा भारतात येणार नाही’ असे म्हटले आहे. यापूर्वी ही मेनुल वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. त्याने आजवर अनेक कॉन्सर्टमध्ये दिसला आहे.