या वर्षाच्या सुरुवातीलाच कंगना रणौतने तिच्या ‘मणिकर्णिका’ या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची घोषणा केली होती. ही घोषणा केल्यापासूनच तिच्यावर कथा चोरल्याचा आरोप केला जात होता. लेखक आशिष कौल यांनी कंगनावर असा आरोप केला होता की, हा चित्रपट त्यांचं पुस्तक ‘दिद्दाः द वॉरियर क्वीन ऑफ काश्मिर’ यावर आधारित आहे. आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, लेखक आशिष कौल म्हणतात, मुंबई मेट्रोपॉलिटन न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर पोलिसांनी कंगना, तिची बहीण रंगोली आणि निर्माता कमल जैनवर फसवणुकीप्रकरणी तसंच कॉपीराईट कायद्याचा भंग केल्याप्रकरणी एफआयआर दाखल करून घेतली होती. View this post on Instagram A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut) जानेवारी महिन्यात कंगना, रंगोली आणि कमल यांना कायदेशीर नोटिसा पाठवल्या. त्यावर कंगनाच्या वकिलांनी आपली बाजू मांडणार असल्याचं सांगितलं. मात्र, एका महिन्यानंतरही त्यांच्याकडून काहीही प्रतिसाद न आल्यानं आशिष यांनी पोलिसांची मदत घेण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं. ते पुढे म्हणाले, अनेक दिवस मी पोलीस स्टेशनला खेटे घालूनही त्यांनी माझी तक्रार नोंदवली नाही. शेवटी मला न्यायालयाची मदत घ्यावी लागली, तेव्हा कुठे माझी तक्रार त्यांनी नोंदवली. कंगनाने दिद्दाच्या विषयावर चित्रपट बनवण्यास काहीही हरकत नाही मात्र, जी संकल्पना, ज्या कथेवर चित्रपट बनवला जात आहे, जो डेटा वापरला जात आहे तो आपण लिहिला आहे आणि त्यासंदर्भात आपण आक्षेप घेत असल्याचं कौल यांनी स्पष्ट केलं आहे. आपण कंगनाला हिरो समजत होतो पण तिनेच आपल्याला धोका दिला असल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.