मराठी चित्रपट “मुंबई पुणे मुंबई -२ लग्नाला यायचंच” या चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा होती. या चित्रपटाची पहिली झलक नुकतीच प्रदर्शित करण्यात आली. दिवाळी दरम्यान १२ नोव्हेंबर २०१५ रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शनासाठी सज्ज होणार आहे.
यावेळी दिग्दर्शक सतीश राजवाडे म्हणाला की, “पहिला मुंबई पुणे मुंबई केवळ दोन पात्रांभोवती चित्रित करण्यात आला होता. एक मुलगा प्रवासात एका मुलीला भेटतो आणि ते दोघे एकमेकांबद्दल बोलत, दोन शहर कशी भिन्न आहेत याबद्दल गप्पा मारत एक अख्खा दिवस एकत्र घालवतात. चित्रपटभर ते दोघे कल्पना, मते, अवकाश आणि इतर मुद्दे कसे वेगळे आहेत याबद्दल चर्चा करतात. दोन परस्पर विरूद्ध व्यक्ती एकत्र भेटतात आणि शेवटी प्रेमात पडतात. मुंबई-पुणे-मुंबई हळूवार सुरू होतो आणि शेवटी ती एक वेगळी लव्ह स्टोरी होते. संपूर्ण जगातील लोकांना हळूहळू या सिनेमाबद्दल कळले आणि ते या प्रवासाच्या प्रेमात पडू लागले. या सिनेमातील दोन व्यक्तिरेखांच्या आपण कुठे जवळपास तरी आहोत का याचा शोध घेऊ लागले. हा सिनेमा वेगवेगळ्या सहा भाषांमध्ये बनवला गेला आणि ग्लोबल ठरला. स्वप्नील आणि मुक्ताला प्रेक्षकांची पसंती मिळाली आणि प्रेक्षकांना त्या दोघांना पुन्हा पहायचे होते. प्रेमातली पुढची पायरी म्हणजे लग्न. त्यामुळे पुन्हा १२ नोव्हेंबर २०१५ रोजी या आणि  प्रेमाच्या प्रवासाचा शोध घ्या… कारण प्रेमकथा सदाबहार असतात. मुंबई पुणे मुंबई -2 सह कुटुंब सह परिवार… लग्नाला यायचंच!”
या चित्रपटाच्या निर्मितीकरिता पहिल्यांदाच मीराह एन्टरटेनमेंट आणि एव्हरेस्ट एन्टरटेनमेंट एकत्र आले असून सतीश राजवाडे यांनी दिग्दर्शन केले आहे. अभिनेता स्वप्नील जोशी आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे  हे दोन लोकप्रिय चेहरे मध्यवर्ती भूमिकेत दिसून येतील.