भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं निधन झालं आहे. ते ८४ वर्षांचे होते. आर्मी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. सोमवारी सकाळी रुग्णालयाने मेडिकल बुलेटिन प्रसिद्ध करत फुफ्फुसांच्या संसर्गामुळे ते सेप्टिक शॉकमध्ये गेले असल्याची माहिती दिली होती. त्यांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आलं होतं. पण अखेर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. अभिनेता रितेश देशमुख याने प्रणव मुखर्जी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. भारताचं खूप मोठं नुकसान झालं आहे, असं म्हणत त्याने आपलं दु:ख व्यक्त केलं.

“प्रचंड दु:ख होतय, आज भारताचं खूप मोठं नुकसान झालं आहे. माजी राष्ट्रपती मा. श्री प्रणव मुखर्जी यांना आपण गमावलं आहे. देशाच्या विकासासाठी त्यांनी दिलेलं योगदान कायम स्मरणात राहिल.” अशा आशयाचं ट्विट करुन रितेश भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. रितेशसोबतच लता मंगेशकर, तापसी पन्नू, कमाल आर. खान, शिल्पा शेट्टी, वरुण धवन, फरहान अख्तर अशा अनेक कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे दु:ख व्यक्त केलं आहे.

१० ऑगस्टपासून प्रणव मुखर्जी यांची प्रकृती बिघडली होती. १० ऑगस्ट रोजी त्यांच्या मेंदूत असलेल्या गाठीवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. दरम्यान एक दिवस आधी त्यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. रुग्णालयात दाखल झाल्यापासून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नव्हती. त्यानंतर ते कोमात गेले आहेत असल्याचं रुग्णालयाकडून सांगण्यात आलं होतं.

प्रणव मुखर्जी हे भारताचे १३ वे राष्ट्रपती होते. राष्ट्रीय राजकारणात ते १९६९ पासून सक्रिय होते. भारतीय राजकारणातील अमूल्य सेवेसाठी त्यांना २००८ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. तर ८ ऑगस्ट २०१९ रोजी त्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.भारताच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात प्रणव मुखर्जी हे राजकारणात सक्रिय झाले होते. १९७३ मध्ये ते केंद्रीय मंत्रिमंडळात होते. १९८२ ते ८४ या काळात त्यांनी देशाचं अर्थमंत्रीपद भुषवलं. १९८० ते १९८५ या कालावाधीत राज्यसभेत ते लीडर ऑफ हाऊसही होते.

इंदिरा गांधी यांच्या मृत्यूनंतर राजीव गांधी देशाचे पंतप्रधान झाले. त्यावेळी काही राजकीय कारणांमुळे त्यांना थोडंसं बाजूला करण्यात आलं. त्यामुळे त्यावेळी राष्ट्रीय समाजवादी काँग्रेस हा पक्षही त्यांनी स्थापन केला होता. मात्र १९८९ नंतर त्यांनी हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला. १९९१ मध्ये राजीव गांधी यांची हत्या झाली. त्यानंतर प्लानिंग कमिशनच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली. त्यानंतर पी.व्ही. नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात प्रणव मुखर्जी हे परराष्ट्र मंत्री होते. २००४ मध्ये जेव्हा यूपीएचं सरकार आलं तेव्हाही ते मंत्रिमंडळात होते. २०१२ ते २०१७ या काळात ते भारताचे राष्ट्रपती होते.