'धडक', 'सूरमा', 'साहेब बीवी और गँगस्टर ३' यांसारख्या चित्रपटांनी जुलै महिना गाजवला. आता चित्रपट रसिकांसाठी ऑगस्टमध्ये मोठी मेजवानीच असून येत्या शुक्रवारी म्हणजेच ३ ऑगस्ट रोजी चार चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. यापैकी 'मुल्क', 'कारवाँ' आणि 'फन्ने खान' हे तीन बहुचर्चित बॉलिवूड चित्रपट आहेत. तर 'पुष्पक विमान' हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जाणून घेऊयात या चित्रपटांबद्दल.. कारवाँ- कारवाँ हा चित्रपट अभिनेता इरफान खानच्या दृष्टीने महत्त्वाचा समजला जात आहे. कारण काही महिन्यांपूर्वीच इरफानने त्याला न्यूरोएंडोक्राइन ट्युमर या दुर्धर आजाराने ग्रासल्याचे सांगितले आणि त्यानंतर प्रदर्शित होणारा त्याचा हा पहिला चित्रपट आहे. इरफानसोबतच यामध्ये दलकर सलमान आणि मिथिला पालकर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. प्रवास हा मानवी आयुष्यातील एक अविभाज्य भाग आहे. प्रवास… मग तो कोणत्याही कारणासाठी का असेना, तो आपल्याला बरंच काही शिकवून जातो, अनुभव देऊन जातो, नव्या माणसांना आपल्याशी जोडून देतो. असाच अनोखा प्रवास या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मुल्क- दहशतवाद, घातपात, हिंदू मुस्लीम वाद, हा मुल्क कुणाचा असे धगधगते प्रश्न या चित्रपटात हाताळले आहेत. ऋषी कपूर, तापसी पन्नू आणि प्रतीक बब्बर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका असलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. शहरामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यासाठी पोलीस ऋषी कपूर व प्रतीक दोघांचा पिच्छा पुरवतात. तर तापसी पन्नू त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी झगडताना दिसते. इस्लामला अन्य धर्मीय कुठल्या नजरेने बघतात, सगळे दाढीवाले दहशतवादी नसतात आणि सगळे हिंदू मुस्लीमद्वेष्टे नसतात असे पैलू ट्रेलरमध्ये दिसले. फन्ने खान- ऐश्वर्या राय बच्चन, अनिल कपूर, राजकुमार राव यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणारा ‘फन्ने खान’सुद्धा सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. ७३व्या अकॅडमी अवॉर्ड्समध्ये नामांकन प्राप्त ‘एव्हरीबडीज फेमस’ या बेल्जियन चित्रपटाचा हा रिमेक आहे. पालकांच्या इच्छेखातर संगीत क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी आलेल्या एका तरुणीचा प्रवास या चित्रपटातून अधोरेखित करण्यात आला आहे. पुष्पक विमान- आजोबा म्हणजे नातवाचा पहिला दोस्त. नंतर लाख आले तरी पहिल्या मित्राची सर नाही. अशाच आजोबा आणि नातवाची म्हणजेच तात्या आणि विलासची गोष्ट 'पुष्पक विमान' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सुबोध भावे आणि मोहन जोशी हे कलाकार रुपेरी पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. तसेच अभिनेत्री गौरी किरण या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीत अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे.