सिनेमाचं वेड गावखेडय़ात राहणाऱ्या आणि शहरात राहणाऱ्या माणसासाठी सारखंच असतं. कधी काळी पडद्यावरच्या नट-नटय़ांकडे पाहून ‘हिरो’ व्हायचंय मला म्हणत गाव सोडून मुंबईकडे येणाऱ्यांची संख्या तेव्हाही कमी नव्हती आणि आजही नाही. मात्र पडद्यावर दिसणाऱ्या कलाकारांच्याही पलीकडे जात मला काही सांगायचं आहे आणि त्यासाठी सिनेमाचं माध्यम चांगलं आहे म्हणत गावखेडय़ातून सिनेमाची वाट शोधत मुंबईकडे येणाऱ्या तरुण दिग्दर्शकांची संख्या वाढते आहे. अर्थात, यात आजही पुण्या-मुंबईतील तरुण दिग्दर्शकांचं प्रमाण जास्त असलं तरी गेल्या काही वर्षांमध्ये खेडय़ातून शिनिमाचं स्वप्न घेऊन मराठी चित्रपटसृष्टीत स्थिरस्थावर झालेल्या दिग्दर्शकांचा टक्काही तितकाच वाढतो आहे.
सोलापूर जिल्ह्य़ातल्या करमाळ्यात राहणारा कुणी एक नागराज मंजुळे असाच पडद्यावरचा शिनिमा पाहून भारावला. ग्रामीण आणि शहरी असे ठळक भेद करायचे म्हटले तरी जगण्यातली तफावत मोजता येऊ नये इतकं समाजमनांमध्ये असलेलं अंतर दाखवून देण्यासाठी त्याने सिनेमाची ताकद वापरली. कसा पोहोचला तो या सिनेमापर्यंत? ‘धग’सारख्या सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या जळगावच्या शिवाजी लोटन पाटील यांच्याबद्दल प्रस्थापितांनाही आश्चर्य वाटलं होतं आणि तेवढंच अप्रूप आज जमीन विकून सिनेमा करणाऱ्या आणि त्या सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या ‘ख्वाडा’च्या भाऊराव कऱ्हाडेंबद्दलही आहे. मात्र, गावखेडय़ातून मुंबईकडे सिनेमा करण्यासाठी येणाऱ्या या तरुण दिग्दर्शकांचा एक प्रवाह खुला झाला असला तरी याच वाटेने येणाऱ्या आणखी सर्जनशील मनांसाठी पायवाट तयार करावी असं या दिग्दर्शकांना वाटतं का? त्याचं उत्तर काही अंशी नाही असं आहे..

ग्रामीण आणि शहरी असा फरक करू नये
माध्यमांचा विस्तार इतक्या वेगाने होतो आहे की त्यातून उत्पन्न होणाऱ्या संधींचा तुम्ही किती उत्तम लाभ rv02घेऊ शकता त्यावर तुम्हाला यश मिळतं. जालन्याची कार्तिकी गायकवाड ‘सा रे ग म प’ या एका शोमुळे उत्तम गायिका म्हणून नावारूपाला आली. सोलापूरच्या शॉर्ट फिल्म करणाऱ्या नागराज मंजुळेने ‘फँड्री’ चित्रपट केला. तो लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केला आणि तो आज जगभरात माहिती झाला. त्यामुळे ग्रामीण आणि शहरी असा फरक केला जाऊ नये, असे मत दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी व्यक्त केले. आम्ही जेव्हा औरंगाबादहून मुंबईत आलो तेव्हाही ‘एनएसडी’ आणि ‘एफटीआयआय’ यांचंच प्रस्थ होतं. पण, मुंबई-पुणे ही सांस्कृतिक राजधानी असल्याने सिनेमा, नाटक, संगीतक्षेत्र काहीही असलं तरी इथे येणं भागच आहे आणि संधीच्या केंद्राजवळ राहणं हे फायद्याचं असतं. पण सध्या माध्यमांतरांच्या संधींचं व्यासपीठ विस्तारलेलं असल्याने कोणीही कलाकार त्याचा लाभ घेऊ शकतो. मात्र, महानगरातील लोकांपेक्षा गावखेडय़ातील लोकांना जगण्याचं वेगळं भान असतं आणि त्यामुळे त्यांचा दृष्टिकोन, त्यांच्या संवेदना या वेगळ्या असतात. त्याचा फायदा त्यांना निश्चित होतो.

गावखेडय़ातील माणसांना लवकर वाट सापडते
‘धग’ करताना मला असंख्य अडचणी आल्या हे खरं आहे. पण, सिनेमा ही कला आहे आणि कलेच्या बाबतीत कुठला कलाकार क शी संवेदना, प्रेरणा घेऊन घडेल याचे काही नियम नसतात. त्यामुळे गावखेडय़ातून rv05येणाऱ्या तरुणांना चित्रपटसृष्टीपर्यंत आणण्यासाठी काही वेगळे आणि ठोस प्रयत्न करता येतील, असं वाटत नसल्याचं स्पष्ट मत दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांनी व्यक्त केलं. पुण्या-मुंबईतील लोकांना सिनेमाबद्दल माहिती असते, त्यांना सहजपणे ती उपलब्ध होऊ शकते हे जरी वास्तव असलं तरी गावखेडय़ातील माणसांना आपल्या ध्येयाची वाट लवकर सापडते असा आपला अनुभव असल्याचं ते सांगतात. मुळात, कुठलंही माध्यम आवडलं की ते आपल्याकडे नाही म्हणून त्याचा शोध घ्यावा, यासाठी ग्रामीण भागातील माणसांची धडपड लवकर सुरू होते. ते प्रत्येक गोष्टीची शहानिशा करतात आणि प्रत्येक गोष्ट टिपून घेत राहतात. मात्र, त्या जमलेल्या अनुभवांच्या शिदोरीतून आपल्या कलेचा आविष्कार साधणं प्रत्येकालाच जमेल असं नाही. इथे व्यक्तीला स्वत:ची कुवत ओळखता आली पाहिजे. तिथे ग्रामीण-शहरी अशा लेबलांचा काही उपयोग नसतो. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये ग्रामीण भागातून आलेल्या दिग्दर्शकांनी दिलेले चित्रपट आणि राष्ट्रीय पुरस्कारांच्या माध्यमातून त्यांना मिळालेली ओळख यामुळे त्यांच्याकडे पाहण्याचा लोकांचा आणि चित्रपट उद्योगाचाही दृष्टिकोन फार लवकर बदलतो हे खरे आहे. अशा दिग्दर्शकांना टिकू न राहण्याच्या दृष्टीने चित्रपट महामंडळासारख्या मातृसंस्थेकडून प्रयत्न झाले तर त्याचे निश्चित चांगले परिणाम होतील, असा विश्वास शिवाजी लोटन पाटील यांनी व्यक्त केला.

आयटीच्या प्रगतीमुळे ग्रामीण भागासाठी सिनेमाक्षेत्र खुले झाले
नगर, विदर्भ असं महाराष्ट्रात जितकं दूर दूर जात राहू तिथे आजही शिक्षणाची हवी तशी सुविधा नाrv06ही. त्यामुळे टीव्ही आणि चित्रपटगृहांमधून सिनेमा या लोकांपर्यंत पोहोचला असला तरी मनोरंजनाच्या पलीकडे त्याचा फोरसा उपयोग होत नाही, असं मत ‘फँ ड्री’कार नागराज मंजुळे यांनी व्यक्त केलं. सिनेमानिर्मितीची कला ही सर्वासाठी खुली झाली आहे. पूर्वी एफटीआयआय किंवा दिल्लीत ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’मध्ये शिकलात म्हणजेच तुम्हाला सिनेमा करता येईल, असे काही जे अघोषित नियम होते ते आता राहिलेले नाहीत. माहिती तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे सिनेमानिर्मितीची कला ग्रामीण भागातील तरुणांसाठीही असाध्य राहिलेली नाही. सिनेमासाठी लागणारी साधनसामुग्रीही तुम्हाला सहज उपलब्ध होते. मात्र अजूनही एक मोठा समाज चित्रपटनिर्मितीच्या प्रवाहात आलेला नाही. तिथली भाषा, तिथले लोक, त्यांचे विषय असा खूप मोठा खजिना दडलेला आहे आणि तो चित्रपटांमधून यायलाच हवा. मात्र विशिष्ट एक नियम करून किंवा एकच एक वहिवाट करून ते शक्य होईल असं वाटत नाही, असं नागराज मंजुळे यांनी सांगितलं.

मराठी चित्रपट ग्रामीण भागात पोहोचण्यासाठी ठोस प्रयत्न हवेत
मला लहानपणीपासून सिनेमांचं वेड होतं. मात्र सिनेमानिर्मितीची प्रक्रिया ही फार वेगळी असते, त्यात अनेक rv07विभाग आहेत, अनेक अडीअडचणी आहेत याची जाणीव जसजसा हा प्रवास करत गेलो तसतशी झाली. ग्रामीण भागातील मुलांना दोन घटका करमणूक म्हणून चित्रपट पाहणं यापलीकडे फारसं काही माहीत नसतं. माझंही तेच होतं, असं ‘ख्वाडा’साठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या भाऊराव  क ऱ्हाडेंनी सांगितलं. लहानपणी सिनेमाचा हिरोच चित्रपट तयार करतो असं वाटायचं. अकरावीनंतर माझं वृत्तपत्रीय वाचन जसं वाढत गेलं तसं मला चित्रपटविश्वाचं कोडं उलगडत गेलं असं सांगणाऱ्या भाऊराव क ऱ्हाडेंनी ग्रामीण भागातील प्रत्येक तरुणाला असं भाग्य मिळत नाही, याबद्दल खंत व्यक्त केली. माझं अज्ञान, मुंबईतील लोकांशी बोलताना आडवा येणारा भाषेपासून सगळ्याच गोष्टींचा न्यूनगंड यामुळे आपण निर्मात्यांना आपल्या चित्रपटासाठी तयार करू शकलो नाही. आणि म्हणूनच जमीन विकून स्वत:चं सिनेमा बनवण्याचं स्वप्न पूर्ण करावं लागलं याबद्दल क ऱ्हाडेंनी खंत व्यक्त केली. आजही कित्येक तालुक्यांत सिनेमागृह नसल्याने ग्रामीण भागातील लोक चित्रपटापासून वंचित राहतात. सिनेमा बनवणं सोपं झालं आहे, पण तो लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ठोस प्रयत्न असायला हवेत, असं मत क ऱ्हाडेंनी व्यक्त केलं.