आमच्याकडे कोकणातल्या घरी गणपती येतो. आम्ही मुंबईत येथे गणपती आणत नाही. आमच्या सावंतांच्या घराण्यात एकच गणपती आणला जातो. बाप्पाचं ११ दिवस साग्रसंगीत पूजन केलं जातं. दरवर्षी मी न चुकता गणपतीत गावी जाते. मात्र, यंदा मी कामात व्यस्त असल्यामुळे मला ११ दिवसांसाठी गावी जाता येणार नाही. पण सध्या मी गोव्यात शूट करतेय तेव्हा निदान एक दिवसासाठी का होईना मी गावी जाऊन येईन. गावी आमचा जुना मोठा वाडा आहे. हा वाडा केवळ गणपतीत उघडला जातो. बाप्पाच्या आगमनापूर्वी सगळीकडे शेणाने सारवले जाते. कणा काढला जातो. आमच्या वाड्यापासून दोन घरं सोडूनचं बाप्पाच्या मूर्त्या तयार केल्या जातात. विशेष म्हणजे आमच्या संपूर्ण गावात शाडूच्या मूर्ती आणल्या जातात. मग आम्ही वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरात बाप्पाचं आगमन करतो. ११ दिवस बाप्पाला वेगवेगळ्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. यावेळी सर्व पारंपारिक पदार्थ नैवेद्यासाठी केले जातात. पहिल्या दिवशी अख्ख गाव जेवायला येतं. मग नंतर ठरवून प्रत्येकाच्या घरी जेवण ठेवलं जातं. रात्री भजनी मंडळ येऊन रात्रभर भजन म्हणतात. ११ दिवस प्रत्येक घर ठरवून भजन केलं जात. माझ्या घरी विशिष्ट अशी मूर्ती ठरवून आणली जात नाही. एक वर्ष आम्ही बाप्पाची उभी मूर्ती स्थापन केली होती. तेव्हा कोणाच्याच घरी तशी मूर्ती नव्हती. तर एक वर्ष मोरावर उभी असलेली मूर्ती होती. आमच्या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे पर्यावरणाच्या दृष्टीने सर्वांनीच शाडूच्या मातीचा बाप्पा आणायचं ठरवलेल आहे. आमचं गाव खूप लहान आहे. त्यामुळे सर्वांनाच एका ठिकाणी तलावात बाप्पाच विसर्जन कराव लागतं. ते सर्व जाणतात की आपण काही मोठ्या समुद्रात वगैरे विसर्जन करणार नाही. पर्यावरणाला कमीत कमी हानी कशी होईल याचा प्रत्येकजण विचार करतो. त्यामुळे आपल्यालाच त्रास होणार नाही.