उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणीचा दोन आठवड्यानंतर उपचारांदरम्यान मृत्यू झाला. दिल्लीच्या सफदरजंग येथील रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु होते. या अमानुष घटनेवर अभिनेत्री फराह खान अली हिने संताप व्यक्त केला आहे. त्या पीडित तरुणीला न्याय द्या अशी मागणी तिने केली आहे.

“हाथरसमधील घटनेवर जर तुम्ही व्यक्त होत नसाल तर नैतिकदृष्ट्या तुम्ही आजारी आहात. हा अमानुष प्रकार आज इतर कोणाच्या मुलीसोबत घडला, उद्या हे आपल्या बाबतीतही घडू शकते. सुशांत सिंह राजपूत प्रकरणात न्याय मागण्यापेक्षा या पीडित तरुणीसाठी न्याय मागणं अधिक गरजेचं आहे. हाथरसमधील त्या तरुणीला न्याय मिळायलाच पाहिजे.” अशा आशयाचं ट्विट करुन फराह खान अली हिने आपला राग व्यक्त केला. यापूर्वी स्वरा भास्कर, कंगना रणौत, मीरा चोप्रा, रिचा चड्ढा, रितेश देशमुख, अक्षय कुमार यांसारख्या अनेक कलाकारांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली होती.

आणखी वाचा- Hathras Gangrape : ‘ओढणी गळ्यात टाकून तिला खेचत नेलं आणि…’; जाणून घ्या १४ सप्टेंबरला नक्की काय घडलं

दिल्लीतील निर्भया प्रकरणासारखे हे प्रकरण असून यात चार तरुणांनी एका तरूणीवर बलात्कार करुन, तिची जीभ छाटून तिची मान मोडल्याचा अत्यंत संतापजनक व अमानुष प्रकार घडला आहे. यामुळे अत्यंत गंभीर स्थितीत असलेल्या या तरुणीची दोन आठवड्यांपासून जीवनमृत्यूशी झुंज सुरु होती. अखेर २९ सप्टेंबर रोजी तिची प्राणज्योत मालवली.