उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणीचा दोन आठवड्यानंतर आज (मंगळवार) उपचारांदरम्यान मृत्यू झाला. दिल्लीच्या सफदरजंग येथील रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु होते. या अमानुष घटनेवर अभिनेता अक्षय कुमार याने संताप व्यक्त केला आहे. बलात्कार करणाऱ्यांना कुठलीही दया माया न दाखवता थेट फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी त्याने केली आहे.

अवश्य पाहा – महिला कलाकारांचीच चौकशी का केली जातेय?; अभिनेत्रीचा NCBला सवाल

“संताप आणि निराशा! सामूहिक बलात्काराच्या या घटना कधी थांबतील? आपले कायदे आणखी कठोर झाले पाहिजेत. शिक्षेचा विचार करुन आरोपी थरथर कापायला हवेत. या दोषींना फाशी द्या. देशातील महिलांच्या सुरक्षेसाठी आवाज उठवा. आपण किमान एवढं तर नक्कीच करु शकतो.” अशा आशयाचं ट्विट करुन अक्षयने आपला संताप व्यक्त केला आहे. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. यापूर्वी स्वरा भास्कर, कंगना रनौत, मीरा चोप्रा, रिचा चड्ढा, रितेश देशमुख यांसारख्या अनेक कलाकारांनी या घटनेवर नाराजी व्यक्त केली होती.

अवश्य पाहा – ‘म्हातारी’ म्हणून चिडवणाऱ्या ट्रोलर्सवर अभिनेत्री संतापली; दिली कायदेशीर कारवाईची धमकी

दिल्लीतील निर्भया प्रकरणासारखे हे प्रकरण असून यात चार तरुणांनी एका तरूणीवर बलात्कार करुन, तिची जीभ छाटून तिची मान मोडल्याचा अत्यंत संतापजनक व अमानुष प्रकार घडला आहे. यामुळे अत्यंत गंभीर स्थितीत असलेल्या या तरुणीची दोन आठवड्यांपासून जीवनमृत्यूशी झुंज सुरु होती. अखेर आज तिची प्राणज्योत मालवली.

पीडित तरुणीने चार तरुणांनी आपल्यावर अत्याचार केल्याचा आरोप केला होता. पोलिसांनी ८ दिवसांनंतर सामूहिक बलात्काराचं कलम एफआयआरमध्ये समाविष्ट केलं होतं. या प्रकरणी भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांनी पीडित तरुणीची भेट घेतली होती. बसपाच्या अध्यक्षा मायावती यांनी देखील याप्रकरणी योगी सरकारवर निशाणा साधला होता. हे प्रकरण चांगलंच तापल्यानंतर युपी सरकारने पीडितेच्या कुटुंबियांना आर्थिक मदतही जाहीर केली.